Join us  

गुन्हे शाखेमुळे दोघांच्या हत्येचा कट उधळला, शस्त्र जप्त

By मनीषा म्हात्रे | Published: April 09, 2024 10:21 PM

अँटोपहिल गोळीबार प्रकरणातील आरोपी जाळ्यात

मुंबई : अँटोपहिल गोळीबार प्रकरणातील आरोपीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकलया आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपीच्या टार्गेटवर आणखीन दोन जण असल्याचे गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आले. गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे दोघांच्या हत्येचा कट उधळला आहे.

विवेक देवराज शेट्टीयार ( २६) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याविरुद्ध  विरोधात हत्या , हत्येचा प्रयत्न व अग्निशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल आहे. त्याच्या विरोधात वेग-वेगळया न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट देखील जारी केली आहेत. गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ने ही कारवाई केली आहे.

अँटॉपहील नाईक नगर परिसरात ६ एप्रिल रोजी गोळीबार करून पसार झाले होते. या हल्ल्यात अक्षय कदम उर्फ स्वामी (३४) जखमी झाला असून  त्याच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपी आपल्या काही मित्रांसह टॅक्सीमध्ये आला आणि सायन कोळीवाडा परिसरात असलेल्या चर्चच्या बाजूला एकटा राहणाऱ्या अक्षयच्या घराचे दार त्याने ठोठावले. झोपेत असलेल्या अक्षयने दरवाजा उघडताच आरोपीने त्याच्यावर गोळीबार केला. यात दोन गोळ्या अक्षयच्या पोटाला लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी सायन रुग्णालयात हलवण्यात आले. या संदर्भात अँटॉप हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला.

पोलीस उपायुक्त दत्ता नालावडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेची वेग-वेगळी पथके स्थापन करुन आरोपीचा शोध सुरु केला. आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून डोंबीवली परिसरात लपून बसला असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ४ ला मिळाली. त्यानुसार, कटई नाका परिसरातून आरोपीला सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडे असलेल्या काळया रंगाच्या सॅक बॅगमध्ये एक देशी बनावटीचे पिस्टल व सहा जिवंत काडतूसे व एक रिकामी पुंगळी मिळून आली.

आरोपीला न्यायालयाने कोरोना कालावधीत कालावधित पॅरोलवर सोडले होते. त्यानंतर तो पुन्हा कारागृहामध्ये हजर झालेला नाही. त्याच्या विरोधात हत्या , हत्येचा प्रयत्न व अग्निशस्त्र जवळ बाळगणे अशा प्रकारचे एकूण १२ गंभीर गुन्हे दाखल असल्याची व त्याच्या विरोधात वेग-वेगळया न्यायालयाने अजामीनपात्र वॉरन्ट देखील जारी केली आहेत. आरोपीताकडे केलेल्या चौकशीत तो आणखीन दोन इसमांवर जिवघेणा हल्ला करणार असल्याची माहिती समोर आली. मात्र गुन्हे शाखेने  वेळीच कारवाई केल्यामुळे दोघांचे प्राण वाचले आहे.

टॅग्स :गुन्हेगारीमुंबई