मुंबई : वरळी गोमाता नगर येथील पालिकेच्या भूखंडावर प्रकल्प बाधितांच्या सदनिका बांधण्याच्या बदल्यात बिल्डरला चक्क दोन लाख चौरस फूट विकास हक्क हस्तांतरणाची खिरापत वाटण्यात आली होती़ मात्र बिल्डरने बांधलेल्या या इमारती काही वर्षांत मोडकळीस आल्या आहेत़ त्यामुळे याप्रकरणात संशय व्यक्त करीत या चारशे कोटी रुपये घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मनसेने गुरुवारी केली़वरळी प्रभादेवी परिसरात पालिकेच्या भूखंडावर नऊ इमारती बांधण्यात येणार होत्या़ यासाठी पालिका, झोपडपट्टी पुर्नविकास प्राधिकरण आणि बिल्डर यांच्यामध्ये करार झाला होता़ या मोबदल्यात बिल्डरालाही घसघशीत टीडीआर मिळणार होता़ मात्र नियमांनुसार या बिल्डरने आरसीसीचे बांधकाम करणे अपेक्षित होते़ परंतु बिल्डरने २००६ मध्ये लोड बिअरिंगचे बांधकाम केले़ यामुळे काही वर्षांतच ही इमारत धोकादायक ठरली आहे़सी १ श्रेणीत टाकण्यात आलेली ही इमारत तातडीने खाली करण्यासाठी पालिकेने कारवाई सुरु केली आहे़ मात्र पालिकेच्या इस्टेट विभागानेच याप्रकरणी बिल्डरवर ठपका ठेवत अहवाल सादर केल्यानंतर पालिका प्रशासनाने अद्याप कोणती कारवाई केलेली नाही, असा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे व स्थानिक रहिवाशांनी केला़ याप्रकरणी आयुक्त अजय मेहता यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही़ (प्रतिनिधी)
पालिकेला ४०० कोटींचा चुना
By admin | Updated: June 17, 2016 03:10 IST