Join us

जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच

By admin | Updated: June 14, 2015 23:16 IST

रविवारी दिवसभर शहरात व जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. जिल्ह्यात आजपर्यंत ४३.३० मि.मि. पावसाची नोंद झाली असून माळशेज

ठाणे : रविवारी दिवसभर शहरात व जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच राहिली. जिल्ह्यात आजपर्यंत ४३.३० मि.मि. पावसाची नोंद झाली असून माळशेज घाटात दरड कोसळून दोन एसटी प्रवाशांचा मृत्यू झाला. दिवसभर पावसाची रिपरिप सुरू असल्यामुळे रविवार असूनही ठाणेकरांना बाहेर पडता आले नाही. शहरातील कोपरी, बाळकुम या दोन ठिकाणी पावसाचे पाणी साचले, तर शॉर्टसर्किटच्या दोन घटना घडल्या. कारवर झाड उन्मळून पडले. माळशेज घाटात एसटी बसवर दरड कोसळून दोन प्रवासी ठार झाले. यामुळे वाहतूक खोळंबली. मुंब्रा बाजारपेठेत पाणी शिरल्यामुळे तेथील रहदारी दीर्घकाळ बंद होती.याशिवाय, जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये कमीअधिक प्रमाणात पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या.दिवसभरात सुमारे ८० मिमी पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली. या दरम्यान दरड कोसळण्याची घटना वगळता कोठेही अनुचित घटना घडली नाही. ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आदी ठिकाणी पाऊस पडला आहे. ठाण्यात संध्याकाळपर्यंत २४.४० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली असली तरी उशिरापर्यंत यात वाढ झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतीच्या कामास सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)