Join us  

काँग्रेस महापालिका निवडणुकीत २२७ जागा स्वबळावर लढवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आगामी महापालिका पालिका निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी राहिला असून, त्या निवडणुकीत काँग्रेस सर्व २२७ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : आगामी महापालिका पालिका निवडणुकीला एक वर्षाचा कालावधी राहिला असून, त्या निवडणुकीत काँग्रेस सर्व २२७ जागा स्वबळावर लढेल, असा मनोदय मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी दिला. शनिवारी रात्री कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल येथे झालेल्या उत्तर मुंबईतील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. विशेष म्हणजे माजी खासदार संजय निरूपम यांना या मेळाव्याला खास निमंत्रित केले होते.

यावेळी मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई महिला काँग्रेसच्या अध्यक्ष डॉ. अजंता यादव, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील व संदेश कोंडविलकर, जिल्हाध्यक्ष अशोक सुत्राळे व उत्तर मुंबईतील काँग्रेसचे सर्व नगरसेवक, जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार भाई जगताप म्हणाले की, मनपा निवडणुकीत मुंबईतील सर्व २२७ जागा लढविण्याची सगळ्यांचीच इच्छा आहे. त्यासाठी मी प्रत्येक वॉर्डात पदयात्रा काढणार आहे. माझी मुंबई माझी काँग्रेसअंतर्गत १०० दिवस १०० वॉर्ड हा उपक्रम राबवणार आहे. आता मुंबई काँग्रेसमध्ये कोणतेच गट-तट नाहीत. आत्ता फक्त मुंबई काँग्रेस हाच एक मोठा गट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

मुंबई काँग्रेसचे कार्याध्यक्ष चरणसिंग सप्रा यावेळी म्हणाले की, काँग्रेसचा कार्यकर्ता हा काँग्रेसचा पाया आहे. काँग्रेस पक्ष मुंबई महापालिका निवडणूक २२७ जागांवर लढविण्यास सज्ज आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, कॉंग्रेस पक्षाने व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुंबईकरांच्या हितासाठी नेहमीच कोविड काळामध्ये जनतेसाठी सर्वांत जास्त काम काँग्रेसने केले. आता या आगामी महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसचे हेच काम जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले.