Join us  

मॉब लिंचिंगमागे संघाचेच विचार, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2019 3:13 PM

या देशामध्ये मॉब लिंचिगसारख्या घटना या आरएसएसच्या विचारामधूनच घडत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

मुंबई - या देशामध्ये मॉब लिंचिगसारख्या घटना या आरएसएसच्या विचारामधूनच घडत आहेत, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच देशात मंदी नाही म्हणण्यापेक्षा खोटे विधान असू शकत नाही, असा टोलाही सावंत यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांना लगावला.आज विजयादशमीनिमित्त नागपूरमध्ये स्वयंसेवकांना संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी मॉब लिंचिंगबाब मोठे विधान केले होते. ''आजकाल समाजातील एका गटाकडून दुस-या समाजाच्या व्यक्तींविरोधात सामूहिक हिंसा करण्याच्या घटना होत आहेत. तशा पाहिल्या तर या घटना एकतर्फी होत नाहीत. काही घटना जाणुनबुजून होतात, तर काहींना अवास्तव स्वरुप देण्यात येते. परंतु कायदाव्यवस्थेच्या मर्यादेचे उल्लंघन करुन होणाऱ्या या घटना परस्पर संबंधांना नष्ट करत आहेत. असली प्रवृत्ती ही आपल्या देशाची परंपरा नाही व संविधानातदेखील ती बसत नाही. कितीही मतभेद असले तरी कायदा व संविधानाच्या मर्यादेच्या आतच राहिले पाहिजे. अशा प्रवृत्तींचे संघाने कधीही समर्थन केलेले नाही व याविरोधात आम्ही उभे आहोत.'' असे सरसंघचालक म्हणाले होते. दरम्यान, सरसंघचालकांच्या आजच्या भाषणावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी घणाघाती टीका केली. ते म्हणाले. ''राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक संघटना आहे, जातीभेदविरोधी संघटना आहे,  आरक्षणाला पाठिंबा देणारी संघटना आहे, संविधानाचा आदर करणारी संघटना आहे, तिरंग्याचा आदर करणारी संघटना आहे, असं म्हणणं जितकं खोटं आहे. तितकंच आरएसएसचा मॉब लिंचिंगशी संबंध नाही आणि देशात मंदी नाही असं मानणे खोटे आहे. देशात ज्या मॉब लिंचिंगच्या घटना घडत आहेत, त्या आरएसएसच्या विचारामधूनच घडत आहेत,'' तसेच देशात सध्या असलेल्या मंदीच्या वातावरणाबाबत सरसंघचालकांनी केलेल्या विधानावरही सचिन सावंत यांनी टीका केली. ''देशात मंदी नाही म्हणण्यापेक्षा खोटे विधान असू शकत नाही,''असा टोला त्यांनी लगावला. 

टॅग्स :लीचिंगसचिन सावंतमोहन भागवत