Join us
Daily Top 2Weekly Top 5

मला हरविण्यासाठीच काँग्रेस नेते राबले - संजय निरुपम

By admin | Updated: February 22, 2017 07:28 IST

मुंबई महापालिका निवडणुकीचे मतदान संपते न संपते, तोच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्याच सहकारी

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीचे मतदान संपते न संपते, तोच मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आपल्याच सहकारी नेत्यांवर टीकेची झोड उठवली. मला हरवण्यासाठी काँग्रेसचे नेते राबले, असा आरोप निरुपम यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना निरुपम म्हणाले की, काही जणांनी पक्षाच्या विरोधात उघड काम केले. काँग्रेसचा मुंबई अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे मुंबईकर चांगला निकाल देतील, अशी मला खात्री आहे. सर्व नेत्यांनी एकत्र काम केले असते तर पक्षाची कामगिरी चांगली असती, असे निरुपम म्हणाले.काही जणांनी संजय निरुपमचा पराभव करायचे ठरवले होते. हा माझा वैयक्तिक पराभव नसून पक्षाची हार आहे, हे त्यांच्या लक्षात आले नाही. असा प्रकार करणारे पक्षाशी निष्ठावान नाहीत. नेत्यांमधील सुंदोपसुंदीचा फटका निकालात बसणार आहे, असा दावाही निरुपम यांनी केला. काही मंडळी शिवसेना-भाजपा नेत्यांच्या सांगण्यावरून किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव माझ्याविरोधात काम करत होते. माध्यमातून माझ्याविरोधात केलेली टीका ही पक्षविरोधी कृती असल्याचे निरुपम म्हणाले.(प्रतिनिधी)