वसई : वसई - विरार शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रसिद्ध केलेल्या मतदारयादीमधील अनेक नावे गायब झाल्याने त्या मतदारांना आपल्या हक्कापासून वंचित राहवे लागणार आहे. गेल्या निवडणुकीत मुंबई शहरात असाच प्रकार घडला होता. अनेक मतदारांची नावे गायब झाल्यामुळे त्यांना मतदान करता आले नव्हते. वसई विरार उपप्रदेशातही असाच प्रकार होणार आहे.मतदारयादीतील नावांमध्ये अनेक चुका आहेतच. पण नावे गायब होण्याच्या प्रकारामुळे मतदारांमध्ये संतापाचे वातावरण आहे. काहींचा पत्ता चुकीचा आहे. त्यामुळे तो शोधणे उमेदवारांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे. परंतु आता त्याबाबत काहीही करता येणे शक्य नसल्यामुळे हजारो मतदार आपल्या हक्कापासून वंचित राहण्याची भीती व्यक्त होत आहे. यासर्व मतदारयाद्यांचे पुनर्निरिक्षण होऊन अद्ययावत केल्याचा निवडणूक यंत्रणेचा दावा फोल ठरला आहे. अनेक याद्यांमध्ये नाव व एका ओळीत पत्ता असल्याने नक्की हे मतदार कुठल्या भागात राहतात, हे समजणे कठीण झाले आहे. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांची चांगलीच ससेहोलपट होण्याची शक्यता आहे. ज्या मतदारांची नावे यादीत नाहीत, अशा मतदारांच्या बाबतीत निवडणूक यंत्रणा काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चुकांमुळे मतदारांत संभ्रम
By admin | Updated: June 6, 2015 23:29 IST