मध्य रेल्वेच्या वेळापत्रकाने काय साध्य केले, या प्रश्नाचे एका शब्दात उत्तर म्हणजे ‘गोंधळ’! नवीन रेक्स (डबे) उपलब्ध नसल्याने आहे तेवढ्याच गाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याच्या नादात मध्य रेल्वेने नवीन वेळापत्रकात ‘अजब’ गोंधळ घातला आहे. यात गाड्यांचा वेग वाढल्याने कागदोपत्री दिसते. पण प्रत्यक्षात मात्र हा वेग अकार्यक्षम सिग्नल यंत्रणा, रेल्वेच्या मार्गांची दुरुस्ती, ‘क्रॉसिंग’च्या कचाट्यात सापडला आहे. आधीच्या वेळापत्रकानुसार अंबरनाथवरून सकाळी ८.२४ ला सुटणारी जलद लोकल पूर्वी डेक्कन एक्सप्रेसच्या आधी अंबरनाथ स्टेशनला पोहोचायची व वेळेत निघायची. ती आता नवीन वेळापत्रकानुसार डेक्कन एक्सप्रेसच्या नंतर रोज विलंबाने येते. मग सीएसटीला परत पोहोचण्यासाठी झालेला विलंब वेग वाढवून टाळायचा, असे ‘लॉजिक’ असले तरी त्यामुळे गाडीतील हजारो प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकते, याचा विचार मध्य रेल्वेने केला आहे का? रोज वेळेत आॅफिस गाठण्यासाठी जी धावपळ प्रवासी करतात व लटकत लटकत गाड्या पकडून प्रवास करतात त्यांचा जीव वाढलेल्या वेगामुळे अधिकच धोक्यात आला आहे. नवीन वेळापत्रकात दुपारची १.२९ ची कसारा लोकल गायब झालेली दिसते. त्यामुळे दुपारी १२.२८ ची कसारा ही अर्धजलद लोकल गेल्यानंतर कसाऱ्याला जाण्यासाठी २.२५ ला म्हणजे एकदम दोन तासांनंतर गाडी आहे. सीएसटीवरून एखाद्या वृध्द व्यक्तीला १२.२८ ची गाडी शारीरिक अडचणींमुळे पकडता आली नाही, तर त्यांना दोन तास रेल्वे स्टेशनवर ताटकळत राहण्यावाचून पर्याय नाही. मधल्या काळात कदाचित ठाणे / कल्याण येथून कसारासाठी लोकल्स असतील तरी ही ‘ब्रेकअप’ जर्नी शारीरिक विकलांग / आजारी/ वृध्द व्यक्तींना शक्य नाही. या बदलाकडे अधिक काळजीपूर्वक, सहानुभूतीने आणि प्रॅक्टीकली पाहणे गरजेचे आहे.- प्रसाद पाठक, अंबरनाथ
रिक्षांविरोधात तक्रारी वाढल्या
By admin | Updated: December 22, 2014 02:24 IST