मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच तृतीयपंथीयांना ‘तिसरे लिंग’ म्हणून मान्यता दिली. मात्र या निर्णयात लेस्बियन, गे आणि होमोसेक्शुअल यांचा समावेश करण्यात आला नाही. परंतु, समाजाने विचारांमध्ये प्रबोधन घडविले पाहिजे, समाजाची मानसिकता बदलली पाहिजे, असे मत एका परिसंवादात मांडले आहे. ‘कशिश मुंबई इंटरनॅशनल क्विअर फेस्टिव्हल’ अंतर्गत पार पडलेल्या परिसंवादात ‘एलजीबीटी’ यांच्या सामाजिक भूमिकेबाबत विविध तज्ज्ञांनी विचार मांडला. त्यात ‘हमसफर’ या सामाजिक संस्थेचे पल्लव पाटणकर यांनी या वर्गाच्या वतीने त्यांच्या मानसिकतेबद्दल विचार मांडले. या वेळी पाटणकर म्हणाले, समाजातील विविध स्तर आणि क्षेत्रांत क्रांती घडत असताना, विचार मात्र आजही मागासलेले आहेत. त्यामुळे समाजातील विचारांचे मूळ बदलले की, क्रांती घडून येईल. तर फेस्टिव्हलमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनीही या फिल्म्सच्या माध्यमातून समाजाकडून असलेल्या आशा मांडण्यात आल्या आहेत, असे मनोगत मांडले. या फेस्टिव्हलअंतर्गत ‘एलजीबीटी’ वर्गाशी संलग्न काही शॉर्टफिल्म्सचे स्क्रीनिंग करण्यात आले. निरनिराळ्या शॉर्टफिल्म्समध्ये समाजापासून दुर्लक्षित असणारी ‘एलजीबीटी’ वर्गाची बाजू दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
समाजाने स्वीकार केला पाहिजे
By admin | Updated: May 27, 2014 04:59 IST