Join us  

'मच्छिमारांना 2100 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी समिती गठीत करणार'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 1:58 PM

राज्यपालांचे कोळी महासंघाला आश्वासन 

मनोहर कुंभेजकर

मुंबई :  राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मासेमारांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपदग्रस्त झालेल्या मच्छिमारांना 2100 कोटी रुपये सानुग्रह मदत द्यावी अशी आग्रही मागणी कोळी महासंघाच्या वतीने केली. त्यासाठी राज्यस्तरावर समिती गठीत करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्राचे  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाला दिले. कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भाजपासाज विधान परिषद सदस्य रमेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोळी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज  सकाळी राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली , त्यावेळी राज्यपालांनी सदर आश्वासन दिले. या प्रसंगी कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, कार्याध्यक्ष प्रकाश बोबडी, युवा अध्यक्ष अँड चेतन पाटील ,महिला अध्यक्षा राजश्री भानजी , विशाल पाटील, सचिन पागधरे ,मनीष पिकले आदी मान्यवर उपस्थित होते .

राज्यात 28 हजार मासेमारी नौका असून 20 हजार मच्छिमार  नौका बंदरावरच परत आल्या, या नैसर्गिक आपत्तीमुळ मच्छिमारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले  आहे.मासेमारीवर झालेला खर्च, डिझेल , बर्फ, खलाशी या  सयंत्रणेवर अवलंबून असणारा कष्टकरी समाजाला  मोठा आर्थिक फटका बसला आहे अशी माहिती आमदार रमेश पाटील यांनी राज्यपालांना दिली.

सहा सिलेंडर मासेमारी नौकेपासून एकेरी मासेमारी करणारा पारंपारिक मच्छिमारांचे झालेले नुकसान लक्षात घेऊन त्यांना सानुग्रह मदत मिळावी यासाठी संपूर्ण कोकण किनारपट्टीवर कोळी महासंघाने आढावा घेतला होता.त्या अनुषंगाने 2100 कोटी रुपयांची आर्थिक मदत मिळावी असे निवेदन राज्यपालांना दिले अशी माहिती आमदार रमेश पाटील यांनी लोकमतशी बोलतांना दिली. याकरिता मच्छीमारांच्या प्रतिनिधींसह राज्यस्तरीय समिती गठीत करून मच्छीमारांना मदत आणि पुनर्वसन केले जाईल असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिल अशीे माहिती त्यांनी शेवटी दिली .

टॅग्स :मच्छीमार