Join us  

दिलासादायक! दहावी, बारावीच्या निकालांचे ८५ टक्के काम पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 6:59 AM

विभागीय सचिवांची माहिती : ४२ लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांची झाली तपासणी

मुंबई : दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार? निकालाचे किती काम पूर्ण झाले? अशा विविध प्रश्नांनी विद्यार्थी, पालक गोंधळले आहेत. मात्र मुंबई विभागीय मंडळाकडून निकालांचे ८५% काम पूर्ण झाल्याची दिलासादायक बातमी मिळाली आहे. येत्या १५ आणि १६ जून रोजी मुंबई जिल्ह्यातून उर्वरित उत्तरपत्रिका मॉडरेटर्सकडून गोळा करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून लवकरच हे काम पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाचे सचिव संदीप संगवे यांनी दिली.

मुंबई विभागातील एकूण ५० लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांपैकी ४२ लाख उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाल्याचे संगवे यांनी सांगितले. देशात कोरोनाचे सावट असताना मुंबई विभाग रेड झोन म्हणून जाहीर झाला. इतिहासाचा पेपर झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लॉकडाऊन जाहीर झाले. त्यामुळे राज्य मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांपैकी मुंबई विभागीय मंडळात सर्वाधिक विद्यार्थी संख्या असलेल्या या विभागातील उत्तरपत्रिका अडकून पडल्या. उत्तरपत्रिका मॉडरेटर्सपर्यंत पोहोचविणे हे मंडळापुढे आव्हान होते.मात्र राज्य सरकार, पोलीस विभाग, महानगरपालिका आयुक्त आणि पोस्टाच्या सहकार्याने हे आव्हान मुंबई विभागाने पेलण्याचा प्रयत्न केला.विभागाने कामांची सुरुवात पालघर जिल्ह्यापासून करीत रायगड, ठाणे शहर, ठाणे उपनगर, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर असे क्षेत्र पूर्ण केले. मुंबई विभागाने उत्तरपत्रिकांसाठी सबमिशन सेंटरचीदेखील वाढ केली. कोणताही मॉडरेटर कोणत्याही सेंटरवर उत्तरपत्रिका तपासणी करून सबमिट करू शकतील, अशी सूट दिली. त्याचा फायदा मंडळाला झाल्याचे संगवे म्हणाले. विद्यार्थ्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे.१५ जूनपासून उत्तरपत्रिकांचे सबमिशनराज्य मंडळाच्या मदतीने आणि मुंबई विभागाच्या कर्मचारी वर्ग, शिक्षक आणि मुख्याध्यापक वर्गाने दिलेल्या सहकार्यामुळे हे काम आम्ही करू शकलो. येत्या १५ आणि १६ जूनला उत्तरपत्रिकांच्या सबमिशनच्या कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :12वी परीक्षाबारावी निकाल