पालघर : पालघरच्या गोठणपूर भागात पाणी,शिक्षण अशा मुलभूत सुविधांची प्रचंड कमतरता आहे. नुकत्याच पार पडलेल्या पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत आश्वासनांचे गाजर दाखविण्यात आले होते. मात्र सध्या जैसे थे च परिस्थिती पाहावयास मिळत आहे. सध्या विधानसभेच्या निवडणूकीमुळे येथील अधिकारी लोकांच्या जीवनाशी खेळ खेळत आहेत. पालघरमधील वॉर्ड क्र.२ गोठणपूरची लोकसंख्या हजार ते बाराशे इतकी आहे. पालघर नगरपालिकेवर सेनेचा भगवा फडकल्याने करण्यात आलेल्या विकासकामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट ठरल्याने पालिकांतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. गोठणपूर येथे गटाराच्या सिमेंट काँक्रीटीकरणाचे कामही अपुर्ण आहे. तसेच उभारण्यात आलेल्या सोयीसुविधांपासून नागरिकांना वंचित रहावे लागते आहे. गटार बांधणीचे नियोजन योग्य रितीने न झाल्याने गटारातील घाण एकाच ठिकाणी साचून डासांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. गटाराचे पाणी नळाची पाईपलाइन व बोअरिंगद्वारे येत असल्याने नागरिक अनेक साथीच्या आजाराने त्रस्त असल्याचे महेश पालांडे यांनी सांगितले. याच भागातील खालचा पाडा येथे जिल्हा परिषदेच्या अंगणवाडीसह १ ली ते ४ थी इयत्तेत २०० ते ३०० विद्यार्थी शिक्षण घेत असून अत्यंत गलिच्छ वातावरणात त्यांना शिक्षण घ्यावे लागत आहे. एक दुरावस्था झालेले शौचालय कोसळण्याच्या मार्गावर असून तीनशे विद्यार्थी या शौचालयाचा वापर करतात. आज येथील गरीब उपेक्षित लोक उज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी व चांगल्या शिक्षणाची व आरोग्याची अपेक्षा ठेवून येतात. मात्र प्रशासनाला त्याचे काही गांभीय नसल्याचेचे चित्र पाहावयास मिळत आहे. अधिकारी मात्र निवडणूकीत व्यग्र आहेत. (वार्ताहर)
गोठणपूर परिसरात नागरी सुविधांची वानवा
By admin | Updated: October 7, 2014 00:37 IST