Join us

पर्यावरणाला मंडळांचा हातभार

By admin | Updated: September 11, 2014 01:25 IST

गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या हाकेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे

मुंबई : गणेशोत्सवादरम्यान पर्यावरणाची हानी होऊ नये म्हणून स्वयंसेवी संस्थांनी दिलेल्या हाकेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी चांगलाच प्रतिसाद दिला आहे. दहा दिवसांच्या गणेशमूर्ती विसर्जनादरम्यान याची प्रचिती आली असून, गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी गणेश विसर्जनादरम्यान आवाजाची पातळी कमी राहिल्याचा निष्कर्ष आवाज फाउंडेशनने काढला आहे.पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनादरम्यानचे ध्वनिप्रदूषणाचे मोजमाप करण्याचे काम आवाज फाउंडेशन दरवर्षी करते. या वर्षीही फाउंडेशनने १० दिवसांच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनादरम्यान ठिकठिकाणांवरील आवाजाची पातळी मोजली असून, गतवर्षी वरळी येथे विसर्जनादरम्यान १२८ डेसिबल एवढी आवाजाची पातळी नोंदविण्यात आली होती. आणि या वर्षी जुहू आणि दादर येथे आवाजाची पातळी ११४ डेसिबल एवढी नोंदविण्यात आली. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी आवाजाची पातळी तब्बल १० डेसिबलने खाली नोंदविण्यात आली असून, हा चांगला पायंडा पडत असल्याचे फाउंडेशनच्या संस्थापक-अध्यक्षा सुमेरा अब्दुलअली यांनी सांगितले. विशेषत: मुंबई आणि उपनगरांतील बहुतेक विसर्जनस्थळांवरील वाद्यवृंदाचा दणदणाट रात्री साडेबारानंतर कमी झाला होता, तर काही मंडळांनी स्वत:हून पुढाकार घेत पर्यावरणाला हातभार लावल्याचे संस्थेने म्हटले आहे. (प्रतिनिधी)