उरण : तालुक्यात चिरनेरचा जंगल सत्याग्रह अतिशय प्रसिद्ध आहे. दरवर्षी या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी अनेक मान्यवर, प्रतिष्ठित मंडळी येत असतात. हुतात्म्यांची आठवण चिरंतर कायमस्वरुपी राहावी, यासाठी चिरनेरच्या ग्रामस्थांतर्फेही वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन केले जाते. आता तर या जंगल सत्याग्रहाचा इतिहास चित्रपटाच्या माध्यमातून साता समुद्राच्या पलीकडे जाणार आहे. चिरनेर तसा आदिवासी शेतकरी, कातकरी, कष्टकऱ्यांचा परिसर. या परिसरात अनेक वर्षांपासून पारंपरिक शेती चालत आहे. २५ सप्टेंबर १९३० रोजी इंग्रज राजवटीत जुलमी इंग्रजांनी चिरनेर परिसरातील एकूण ८ व्यक्तींना बेछूट गोळ्या घातल्या होत्या. हा आंदोलन लढा दडपून टाकण्यासाठी इंग्रज शिपायांनी सत्याग्रहींवर बेछूट गोळीबार केला. त्यात नि:शस्त्र आठ कातकरी शेतकऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. शेतकरी, कातकरी वर्गाने काठ्या, कोयते, कुऱ्हाड, विळा इत्यादी लाकडी, लोखंडी अवजारे हातात घेऊन सत्याग्रहासाठी घरातून रस्त्यावर आले होते. महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरु केली. त्या चळवळीला पाठिंबा देत उरणमधील शेतकऱ्यांनीही आपल्या जीवाची पर्वा न करता सत्याग्रह करुन इंग्रजांप्रती आपला रोष व्यक्त केला होता. यावेळी झालेल्या सत्याग्रहात इंग्रजांनी केलेल्या गोळीबार, मारहाणीमुळे अनेक जण अपंग झाले तर नान्या म्हादू कातकरी (चिरनेर, अक्कादेवी वाडी), धाकू गवत्या फोफेरकर, रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या वीरपुरुषांना झालेल्या गोळीबारात वीरमरण आले आणि ते हुतात्मे झाले. चिरनेरच्या स्मृतीला मानवंदना देतानाच त्यांचे विचार व कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे काम चित्रपटाच्या माध्यमातून केले जाणार आहे.
चित्रपटातून उलगडणार चिरनेरचा जंगल सत्याग्रह
By admin | Updated: June 6, 2015 22:38 IST