Join us

बालदिनी वडिलांनी केले मृत मुलाचे अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 00:07 IST

१४ नोव्हेंबर रोजी गुरुवारी बालदिनाच्या दिवशी वडिलांनी आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन आदर्श निर्माण केला आहे.

मुंबई : १४ नोव्हेंबर रोजी गुरुवारी बालदिनाच्या दिवशी वडिलांनी आपल्या मुलाचे अवयवदान करण्याचा निर्णय घेऊन आदर्श निर्माण केला आहे. वडिलांच्या या निर्णयामुळे जवळपास तीन जणांना नवसंजीवनी मिळाली असून पुन्हा एकदा जगण्याचे बळ मिळाले आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या २१ वर्षीय मुलाच्या अवयवदानाचा निर्णय घेतला आहे.काही दिवसांपूर्वी या २१ वर्षीय तरुणाचा रस्ते अपघात झाला होता. या तरुणाला तातडीने वाशीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे रुग्णाला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केले. तरुणाच्या कुटुंबीयांना अवयवदानाबाबत माहिती असल्याने त्यांनी मुलाचे अवयवदान करण्यास होकार दिला. कुटुंबाच्या संमतीनंतर यकृत, दोन्ही मूत्रपिंडे, कॉर्निया आणि हाडे दान करण्यात आली आहेत. त्यामुळे तीन जणांना नव्याने आयुष्य मिळण्यास मदत झाली आहे.रुग्णाचे एक मूत्रपिंड त्याच रुग्णालयातील एका १९ वर्षांच्या मुलाला देण्यात आले आहे. कॉर्निया नेत्रपेढीत तर हाडे आॅर्गन बँकमध्ये दान केली आहेत. याशिवाय यकृतआणि एक मूत्रपिंड मुंबईतीलखासगी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.यासंदर्भात अवयवदान समन्वयक संदीप गुदूरू म्हणाले, आतापर्यंत पाच अवयवदान तर ४ लिव्हिंग डोनरद्वारे यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत. याशिवाय वडिलांनी मुलाचे अवयवदान केल्याबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले.।‘जनजागृतीमुळे अवयवदानाच्या प्रमाणामध्ये वाढ’याबाबत मुंबईतील विभागीय प्रत्यारोपण समन्वयक केंद्राचे अध्यक्ष डॉ. एक.के माथूर म्हणाले, गेल्या वर्षी मुंबईमध्ये ४८ अवयवदान पार पडले होते. मात्र यंदाच्या वर्षी ७३ अवयवदानांची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय या वर्षी अजून अवयवदान होतील, अशी आम्ही आशा करतो. समन्वयकांचे उत्तम काम आणि समाजात पसरवण्यात आलेली जनजागृती यामुळे अवयवदानाच्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.