Join us  

Children's Day 2019: देशातील बालकांची परिस्थिती आजही ‘दीन’च

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 6:32 AM

मोठ्या पाइपलाइन वा अन्य घाणेरड्या जागी व्यसने करणारी अशा अनेक रूपात शून्य नजरा घेऊन लहान मुले आजही फिरताना दिसतात.

सीमा महांगडे मुंबई : सिग्नलला गाडी थांबली की, गाडीवर कापड मारणारी, बस स्टँड, गर्दीचे रस्ते, मंदिरांपाशी केविलवाण्या नजरेने पैशांसाठी हात पसरणारी, चहाच्या टपऱ्या, खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर भांडी विसळणारी, कचरा-कोंडाळा, मोठ्या पाइपलाइन वा अन्य घाणेरड्या जागी व्यसने करणारी अशा अनेक रूपात शून्य नजरा घेऊन लहान मुले आजही फिरताना दिसतात.बालकांची ही दीन परिस्थिती भारतात कायम आहेत. त्यातून बाहेर पडण्यासाठी रोज किमान २० हजार मुलांचे कॉल्स चाइल्डलाइन हेल्पलाइनला येतात. देशभरातून बालकांच्या १ कोटी २० लाख १६ हजार ८०२ तक्रारी या वर्षाअखेरीस आल्याची माहिती चाइल्डलाइन हेल्पलाइनचे रिसोर्स मॉबलायझेशन हेड विकास पुथरन यांनी दिली. पश्चिम विभागातील ८४ शहरांतून ३२ लाख ७९ हजार २१७, तर पूर्व विभागातून ११८ शहरांतून २२ लाख १८ हजार २६४ तक्रारींची नोंद झाली. उत्तरेच्या १०८ शहरांतून ४४ लाख ५४ हजार ६१७ आणि दक्षिणेच्या १०२ शहरांतून २० लाख ६४ हजार ७०४ तक्रारींची नोंद वर्षभरात झाली.गैरवर्तनाच्या, मारझोडीच्या तक्रारींचे प्रमाण सर्वाधिक असून, मुलांकडून ४४ हजारांहून अधिक गैरवर्तनाच्या तक्रारी आल्या. मुलींच्या तक्रारींचे प्रमाण ७० टक्के आहे. त्यानंतर बालमजुरी, शैक्षणिक, घरातून पळून जाणे, स्थलांतर, व्यसन, भावनिक व मानसिक त्रास अशा तक्रारींचा समावेश असल्याची माहिती चाइल्डलाइनने दिली.महाराष्ट्रातून मुलांच्या तक्रारींचे प्रमाण ६१ टक्के तर मुलींच्या तक्रारींचे प्रमाण ३९ टक्के आहे. मुलांच्या तक्रारी सोडविण्यासाठी चाइल्डलाइनद्वारे ५४३ जिल्ह्यांत ९०० सेवाभावी संस्था कार्यरत आहे. देशातील ११६ रेल्वे स्थानकांवर, तर मुंबईत सीएसएमटी, एलटीटी, दादर, वांद्रे, मुंबई सेंट्रल येथे त्यांची कार्यालये आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून चाइल्डलाइनकडे तब्बल १ लाख ६७ हजार १८0 तक्रारी आल्या. मुंबईत तक्रारींची संख्या १,१२,८११ असून औरंगाबादमधून ४०,१८३ तक्रारी आल्या. यवतमाळ जिल्ह्यातून ३७,५४३ तर वर्ध्यातून १४,९८७ तक्रारी आल्या. या मुलांच्या पुनर्वसन व मदतीसाठी, हक्काचा निवारा देण्यासाठी, त्यांना समजून घेण्यासाठी चाइल्डलाइन हा केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाचा उपक्रम आहे. तक्रारीसाठी १०९८ या क्रमांकावर संपर्क साधता येतो. महाराष्ट्रातून १०९८ क्रमांकावर चाइल्डलाइनला ४,५७१ तक्रारी आल्या. अन्य माध्यमातून ३,२९०, थेट कार्यालयात १,०६६ , वेबसाइटद्वारे १४ तक्रारी आल्या .>परिचितांकडूनच अधिक शोषणसमाज शैक्षणिक, सामाजिकदृष्ट्या आधुनिकतेकडे वाटचाल करत असताना मुलांशी होणारे गैरवर्तन, त्यांचे शोषण ही खेदाची बाब आहे. मुलांच्या तक्रारी कमी होताना दिसत नाही. विशेष म्हणजे, त्यांचे शोषण अनोळखी व्यक्तींपेक्षा त्यांच्या माहितीतील, कुटुंबातील लोकांकडून अधिक होते, ही चिंतेची बाब आहे. - विकास पुथरन, रिसोर्स मोबलायझेशन हेड, चाइल्डलाइन.