Join us  

मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2019 3:15 AM

पावसाळ्यातील तयारीसंदर्भात सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. या काळात पुनर्वसन व योग्य तयारी केल्यास संभाव्य आपत्ती टाळू शकतो.

मुंबई : पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील, मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह विविध विभागाचे सचिव, तीनही सैन्य दलाचे अधिकारी, तटरक्षक दलाचे अधिकारी, राष्ट्रीय व राज्य आपत्ती प्रतिसाद दल, सर्व विभागीय आयुक्त, विविध महापालिकांचे आयुक्त तसेच केंद्र व राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, पावसाळ्यातील तयारीसंदर्भात सर्व यंत्रणांनी चांगली तयारी केली आहे. या काळात पुनर्वसन व योग्य तयारी केल्यास संभाव्य आपत्ती टाळू शकतो. मागील काही वर्षात सर्व यंत्रणांनी पावसाळ्यात चांगल्या प्रकारे काम केले आहे. त्या अनुभवावरून पुढील काळात आणखी चांगले काम करता येईल. मात्र, त्यावरच अवलंबून न राहता, संस्थागत ज्ञान, अनुभव व दूरदृष्टी ठेवून योग्य तयारी केल्यास आपत्ती टाळता येईल.

मदत व पुनर्वसन मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील विविध विभागांनी पावसाळ्यात घडणाऱ्या आपत्ती निवारणासाठी मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे. तसेच या तयारीची माहितीही नागरिकांपर्यंत पोहचवावी.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमुंबई