मुंबई : केंद्र सरकारच्या परवानगीनंतरच राज्य शासनाने लंडन येथे डॉ. बाबसाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी बंगला विकत घेण्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यात हस्तक्षेप करू नये, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे अध्यक्ष खा. रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली. लंडन येथील वास्तू खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने वाटाघाटी सुरू केल्या आहेत. त्यासाठी १० टक्के अनामत रक्कम अदा करण्यात आली. अशावेळी केंद्र सरकारने स्वत:च ही वास्तू विकत घेऊन विकसित करण्याबाबत विचारणा केली आहे. केंद्र सरकारच्या नव्या भूमिकेमुळे या स्मारकाला विनाकारण विलंब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रक्रियेत केंद्राने खोडा घालू नये, असे आठवले यांनी सांगितले. गेल्या १० महिन्यांपासून स्मारकाचा प्रश्न रेंगाळला होता. तो आता अंतिम टप्प्यात आला असताना विनाकारण त्यात खोडा घालू नये, असे आवाहन आठवलेंनी केले.
केंद्र सरकारने स्मारकात खोडा घालू नये -आठवले
By admin | Updated: June 9, 2015 04:07 IST