मुंबई : सणांंच्या काळात ऑनलाइन भामटेही सक्रिय झाल्याचे पाहावयास मिळत आहे. विविध फेस्टिव्हल ऑफरच्या नावाखाली एक लिंक पाठवून तुमच्या खात्यावर ऑनलाइन डल्ला मारत आहे. त्यामुळे अशा कुठल्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू, नये असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना, प्रधानमंत्री आवास योजनेतून पैसे मिळतील, दोन महिन्यांसाठी नेटफ्लिक्स सेवा किंवा इंटरनेट सेवा मोफत देण्यात येईल, जीओचे पाचशे रुपयांचे रिचार्ज मोफत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रत्येकाला ६० जीबी इंटरनेट सेवा मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे आदी आमिषे समाजमाध्यमांवरून दाखविली जात आहेत. प्रत्यक्षात या सेवा पदरी पाडून घेण्यासाठी लिंक डाऊनलोड करण्याचे आवाहन केले जाते. ही लिंक डाऊनलोड केल्यास मालवेअर किंवा व्हायरसद्वारे भ्रमणध्वनी, संगणकाचा ताबा घेऊन त्यातील संवेदनशील माहिती भामटे मिळवतात. त्याआधारे आर्थिक फसवणूक, माहितीची चोरी, बदनामी किंवा अन्य गुन्हे घडू शकतात. त्यामुळे अशा आमिषांना बळी पडू नका, असे आवाहन राज्याच्या सायबर विभागाने नागरिकांना केले आहे.
गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्र, दिवाळी अशा विविध सणांंच्या विविध ऑफरचे आमिष दाखवत सायबर ठग फसवणूक करत आहेत. त्यामुळे कुठल्याही आमिषाला बळी पडू नका. अधिकृत संकेतस्थळावरूनच व्यवहार करा, असे सायबर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.
८ महिन्यांत ४०० गुन्हे
जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान मुंबईत क्रेडिट कार्ड आणि ऑनलाइन फसवणुकीचे ४०० गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. यापैकी अवघ्या ४७ गुन्ह्यांची उकल करण्यात आली असल्याची माहिती पोलीस दफ्तरी नोंद असलेल्या आकडेवाऱीतून समोर येत आहे. गेल्या वर्षी याच ८ महिन्यांत ३४१ घटनांची नोंद झाली होती.
अशीही होते फसवणूक
फेसबुकवरून विविध जाहिरातींच्या आडून ठग मंडळी नागरिकांना स्वस्तात वस्तू देण्याचे आमिष दाखवून गंडा घालतात, तर दुसरीकडे बनावट प्रोफाइलवरून आधी ओळख करायची. पुढे ओळखीतून प्रेमात रूपांतर होताच संबंधित व्यक्तीची गोपनीय माहिती मिळवून फसवणूक होत असल्याच्या घटनाही वाढत आहेत. पुढे गोपनीय माहिती, अश्लील फोटो शेअर करण्याच्या नावाखाली पैशांची मागणी होते.