स्नेहा पावसकर, ठाणेठाणे कौटुंबिक न्यायालयात समुपदेशनासाठी विवाह समुपदेशकांकडे येणाऱ्या खटल्यांची संख्या जास्त असली तरी दुसरीकडे सप्टेंबर ते डिसेंबर २०१३ या ४ महिन्यांपेक्षा जानेवारी ते एप्रिल या ४ महिन्यांमध्ये निकाली लागलेल्या खटल्यांची संख्याही अधिक आहे. प्रत्येकी ४ महिन्याला सुमारे २०० हून अधिक खटले निकाली लागतात. त्यामुळे एकच समुपदेशक असले तरी जास्तीतजास्त खटले निकाली लावण्याचा हा ठाणे कौटुंबिक न्यायालयाचा प्रयत्न उल्लेखनीय आहे. कौटुंबिक न्यायालयात दाखल होणारे घटस्फोट, पोटगी, संमतीपत्र, मुलांचा ताबा आणि इतर कौटुंबिक वाद असे सर्वच खटले समुपदेशनासाठी विवाह समुपदेशकांकडे येतात. दर चार महिन्याला नव्याने दाखल होणाऱ्या खटल्यांची संख्या वाढत असताना दुसरीकडे जास्तीतजास्त खटले निकाली लावण्यासाठीसुद्धा विवाह समुपदेशक प्रयत्नशील असतात.याखालोखाल निकाली लागलेल्या खटल्यांमध्ये पोटगी, मुलांचा ताबा, वस्तूंची देवाण-घेवाण, मुलांची भेट घडवून देणे यांचीही संख्या मोठी आहे. नव्याने दाखल होणाऱ्या खटल्यांबाबतीत दोन्ही बाजूंच्या व्यक्तींचे म्हणणे ऐकून, समजून घ्यावे लागते. त्यामुळे समुपदेशन करून निर्णय द्यायला जास्त वेळ लागतो. परंतु, जे खटले जुने असतात, त्यांच्या समस्या, विचार माहिती होतात. त्यामुळे जुन्या खटल्यांसाठी जास्त वेळ देऊन ते लवकरात लवकर मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न असतो. एके दिवशी १२-१३ खटल्यांचे समुपदेशन होते. परंतु, त्यापेक्षा जास्त खटले असल्यास सगळ्यांनाच वेळ देण्याचा प्रयत्न करते, असे ठाणे कौटुंबिक न्यायालयाच्या विवाह समुपदेशक सुजाता कुलकर्णी यांनी सांगितले.
समुपदेशनामुळे निकाली खटले वाढले
By admin | Updated: August 18, 2014 00:56 IST