Join us

कृषीक्षेत्रातील करिअरच्या संधी

By admin | Updated: June 9, 2014 02:19 IST

बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे

मुंबई : बारावीनंतर विद्यार्थी इंजिनीअरिंग, मेडिकल आणि इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पण भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या कृषी क्षेत्राकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूपच कमी आहे. देशातील नागरिकांची अन्नाची भूख भागविण्याची जबाबदारी असलेल्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक उत्पन्न मिळविता येते. पारंपरिक शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तरी कृषीक्षेत्रात नक्कीच प्रगती घडून येईल. शहरांमध्ये हाताला रोजगार मिळत असल्याने ग्रामीण भागातील तरुण मोठ्या संख्येने शहरात येतात. त्यामुळे ग्रामीण भागात शेती करण्याचे प्रमाण घटले असले तरी तंत्रज्ञानामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. उच्च शिक्षण घेतलेले तरुणही कृषी अभ्यासक्रम पूर्ण करून देशभरात शेतीव्यवसाय करीत आहेत. यासाठी या क्षेत्राला करिअर म्हणून पाहणेही महत्त्वाचे आहे. राज्यात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या चारही कृषी विद्यापीठांमध्ये पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यात येतात. या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत केंद्रीय आॅनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. या सर्व अभ्यासक्रमांचे माध्यम इंग्रजी असते.