रवींद्र साळवे, मोखाडा ग्रामीणमुलांना पूर्व प्राथमिक शिक्षणाची तोंडओळख व्हावी व त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, याकरिता अंगणवाडी हा शैक्षणिक उपक्रम सरकारने सुरू केला. या उपक्रमाला आता पंचवीसहून अधिक वर्षे झाली आहेत. अंगणवाडीमुळे मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण झाली, त्यामुळे प्राथमिक शिक्षणाचे प्रमाण वाढले, मात्र गेल्या काही वर्षात अंगणवाडीतील शिक्षणाचा दर्जा घसरला असल्याने शासनाच्या उदात्त हेतूला मूठमाती देण्याचे काम स्थानिक प्रशासन करत असल्याने त्याचा बोजवारा उडाला आहे.मोखाड्यात अंगणवाडीतील मुलांची संख्या ११ हजार ६२५ एवढी असून १७१ मूळ अंगणवाड्या तर ५१ मिनी अंगणवाड्या आहेत. परंतु बऱ्याचशा अंगणवाड्यांमध्ये मुलांना दिली जाणारी खेळणी, शिक्षण विषयक साहित्य दिसून येत नाही, तर काही अंगणवाड्या दुरवस्थेमुळे अंतिम घटका मोजत आहेत. तालुक्यातील पायरवाडी येथील अंगणवाडीची दयनीय अवस्था झाली आहे. या अंगणवाडीचे पत्रे तुटून, फुटून गेल्याने ही अंगणवाडी पूर्णपणे गळत आहे, त्यामुळे येथे मुलांना उभे राहायलाही जागा नाही. यामुळे ही अंगणवाडी ओट्यावर किंवा कुणाच्या तरी घरी भरवावी लागत आहे. मुलांची गैरहजेरी व कर्मचाऱ्यांचीही गैरहजेरी यामुळे या अंगणवाड्यांचा पुरता बट्ट्याबोळ झाल्याने अंगणवाडी मुलांसाठी खाऊ वाटपाचे ठिकाण बनले आहे. मुलांची हजेरी खाऊ घेण्यासाठीच असते, तर कर्मचारी मात्र शासकीय कामात गुंतलेले असतात.शहरी मुलांना नर्सरीसारखे पूर्वप्राथमिक शिक्षणासाठी पर्याय उपलब्ध आहेत. परंतु ग्रामीण भागातील मुलांसाठी नर्सरी नसल्याने व त्यांची आर्थिक कुवत नसल्यामुळे अशाप्रकारचे शिक्षण उपलब्ध होऊ शकत नाही. ग्रामीण भागातील अंगणवाड्या वरदानच आहेत. परंतु अंगणवाड्यांची सध्याची स्थिती पाहता या शासनाच्या मूळ हेतूला हरताळ फासण्याचे काम होत असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत आहे.शासन कुपोषण, बालमृत्यू कमी व्हावे यासाठी प्रयत्नशील आहे. यासाठी शासन या कर्मचाऱ्यांना चारआकडी पगारही देत आहे. ३५ अंगणवाड्यांचे दुरूस्तीचे प्रस्ताव पाठवण्यात आल्याचे सांगितले.
अंगणवाड्यांचा बोजवारा...
By admin | Updated: August 3, 2014 23:54 IST