Join us
Daily Top 2Weekly Top 5

नॅशनल पार्कच्या १३ आदिवासी पाड्यातील बांधवांचे उपोषण संपले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:35 IST

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १३ आदिवासी पाड्यांतील आदिवासी बांधव हे गेली अनेक वर्षे मूलभूत समस्यांपासून ...

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील १३ आदिवासी पाड्यांतील आदिवासी बांधव हे गेली अनेक वर्षे मूलभूत समस्यांपासून वंचित आहेत. काल प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी येथील असलेल्या १३ पाड्यातील आदिवासी कुटुंबे आपल्याला मूलभूत सुविधांपासून वंचित राहिल्याच्या विरोधात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपोषणास बसले होते.

पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, घरदुरुस्तीसाठी तत्काळ परवानगी, स्थानिक तरुणांना उद्यान परिसरातच रोजगार उपलब्ध व्हावा, स्थानिक महिलांना खाद्यपदार्थ, रानमेवा व अन्य वस्तूंच्या विक्रीची सोय, पाड्यात मुलांसाठी शिक्षणाची सोय, उद्यान परिसरातच आदिवासी पाड्यांचे योग्य पुनर्वसन व संरक्षण मिळावे, अशा प्रमुख मागण्यांचा यात समावेश होता.

उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी या आदिवासी पाड्यातील आदिवासी बांधवांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून त्यांची सोडवणूक करण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करून आपल्या समस्यांचे लवकरात लवकर मार्ग काढण्याचे व सर्वतोपरी मदतीचे आश्वासन उपोषणकर्त्यांना दिले.

खासदारांवर निश्चित विश्वास दाखवत बिरसा मुंडा आदिवासी श्रमिक संघाचे अध्यक्ष देवेंद्र ठाकूर, प्रमोद शिंदे व सोबतच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधी, कार्यकर्ते व पाड्यातील नागरिकांनी उपोषण मागे घेतले

--------------------------------------------