खालापूर : गेल्या अनेक वर्षांपासून खोपोली शहरातील समाजमंदिर रस्ता अनधिकृत हातगाड्यांनी व फेरीवाल्यांनी व्यापला आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह खरेदीसाठी येणाऱ्या महिलांना व शाळकरी मुलांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. वारंवार हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनत आहे. याबाबत अनेक तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. अखेर या तक्रारींची दखल घेत पालिका प्रशासनाने पोलीस ठाणे ते दीपक हॉटेल आणि पुढे रेल्वे स्थानकापर्यंतचा कारवाई केल्याने अखेर या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. शहरातील हॉटेल सागर प्लाझा ते जुना मुंबई - पुणे महामार्गापर्यंत केंद्र शासनाच्या निधीतून अलीकडे पालिकेने ६४ लाख रु पये खर्च करून सिमेंट कॉंक्र ीटचा रस्ता तयार केला. हा मुख्य रस्ता असल्याने या रस्त्यावरून अनेक अवजड वाहने तसेच इतर वाहनांची कायम वर्दळ असते. या रस्त्यावर दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडून हा रस्ता वाहतुकीसाठी निकामी ठरत असताना अनेकांच्या रोषाला पालिकेला सामोरे जावे लागत होते. जुना मुंबई - पुणे महामार्ग ते आंबेडकर चौक, दीपक हॉटेल ते पुढे रेल्वे स्थानकापर्यंत हातगाडीधारक ते अन्य फेरीवाले व अन्य सर्वच वाहनांसाठी नो पार्किंग झोन पालिकेने घोषित केला आहे. अनेक वर्षांनंतर फेरीवाल्यांनी गजबजलेल्या रस्त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास होता. रुग्णवाहिकाही अनेकदा वाहतूक कोेंडीत अडकते. परंतु पालिका मुख्याधिकारी सुदाम धुपे यांनी रस्त्यावरील अडथळे ठरणाऱ्या सर्वच बाबींवर कडक धोरण आखून कारवाई केल्याने अखेर अनेक वर्षे कोंडीत सापडलेल्या या रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. (वार्ताहर)
मुख्य रस्त्याने घेतला मोकळा श्वास
By admin | Updated: July 14, 2014 23:14 IST