वरपगाव : वेतनवाढ, पदोन्नती, शासनसेवा व रिक्त पदांची भरती अशा विविध मागण्यांसाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या संघटनेने १ जुलैपासून संप पुकारला होता. यामुळे जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ग्रामीण रुग्णालयांतील रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याच्या संधीचा लाभ उठवून तालुक्यातील अनेक मोठ्या लोकवस्तीच्या गावांत बोगस डॉक्टरांनी डोके वर काढले असून तालुका वैद्यकीय विभागाने मात्र याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे.महागाई, त्यात पावसाने फिरवलेली पाठ यामुळे बळीराजासह सर्वसामान्य जनता त्रासली आहे. सध्या अधूनमधून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे डबकी, खड्डे भरले आहेत. दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे व कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे सर्दी, ताप यासह उलटी, जुलाब, मलेरिया, कावीळ, टायफॉइडचेही प्रमाण वाढू लागले. या संधीचा लाभ उठवण्याकरिता अनेक परप्रांतीय बोगस डॉक्टरांनी जागोजागी दवाखाने थाटले आहेत़म्हारळ, पिसवली, गोळवली, खडवली, आजदे, बल्याणी, उंबार्ली, मोहने, आंबिवली, नांदिवली, टिटवाळा, धोबीघाट, बिर्ला गेट, शहाड, वालधुनी आदी परिसरांत या डॉक्टरांनी दुकाने थाटली आहेत. बोगस पदवी लावायची व धंदा सुरू करायचा, असे धोरण या डॉक्टरांचे असून अनेकांनी सायकल दुरुस्ती दुकाने, चहाची टपरी अशा ठिकाणी हे दवाखाने सुरू केले आहेत. काहींनी तर फलक लावले आहेत. (वार्ताहर)
कल्याण तालुक्यात बोगस डॉक्टर वाढले
By admin | Updated: July 13, 2014 23:27 IST