Join us
Daily Top 2Weekly Top 5

वारांगनेची हत्या करून मृतदेह ४ दिवस घरातच ठेवला लपवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 01:37 IST

शिवाजीनगरच्या नटवर पारेख कम्पाउंडमधील म्हाडा इमारतीजवळील पाण्याच्या पिंपामध्ये ११ मे रोजी ३० ते ४० वर्षांच्या महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला होता.

मुंबई : अनैतिक संबंधातून वारांगनेची हत्या करून, चार दिवस तिचा मृतदेह घरातच ठेवल्याची माहिती शिवाजीनगर येथे पाण्याच्या पिंपात सापडलेल्या महिलेच्या मर्डर मिस्ट्रीतून समोर आली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी नेरुळच्या बाबू भगवान पटेल (६०) याला अटक केली असून, त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे.शिवाजीनगरच्या नटवर पारेख कम्पाउंडमधील म्हाडा इमारतीजवळील पाण्याच्या पिंपामध्ये ११ मे रोजी ३० ते ४० वर्षांच्या महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या प्रकरणी शिवाजनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक पगारे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तपास पथकाने पिंपाची वाहतूक केलेल्या टेम्पोचा शोध सुरू केला. तो वाशी येथून आणल्याचे स्पष्ट होताच, टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत टेम्पो नेरुळ येथील करावे गावातून आणल्याची माहिती मिळाली. यासाठी त्याला सहाशे रुपये भाडे दिले होते. पोलिसांनी पाळत ठेवल्यानंतर पटेल पोलिसांच्या हाती लागला. त्याच्या चौकशीत महिलेचे नाव मीना असून, ती दादर परिसरात वेश्याव्यवसाय करत असल्याची माहिती समोर आली. महिलेच्या हत्येनंतर त्याने चार दिवस तिचा मृतदेह घरातच ठेवल्याची माहिती दिली. दुर्गंधी येऊ लागल्याने त्याने वीणाचा मृतदेह प्लॅस्टिक पिशवीत गुंडाळून ती पाण्याच्या पिंपात लपविल्याचे सांगितले.पटेल यापूर्वी शिवाजीनगर परिसरात राहात होता. त्यामुळे या परिसराची त्याला माहिती होते. आपला कुणालाही संशय येणार नाही, यासाठी त्याने शिवाजीनगरच्या म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक १ च्या शेजारी हा पिंप ठेवून तो निघून गेला.पत्नीचाही सहभाग :पटेलसह त्याच्या पत्नीचाही यात सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. ती पसार आहे.हत्येचा कट पूर्वनियोजित : वीणाच्या हत्येचा कट हा पूर्वनियोजित असल्याची शक्यता परिस्थितीजन्य पुराव्यांवरून पोलिसांनी वर्तविली आहे. 

टॅग्स :खून