मुंबई : दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी मुंबईतील नयन फाउंडेशनचे नेत्रहीन गोविंदा थरावर थर रचणार आहेत. दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून जी रक्कम मिळेल त्यातील १० टक्के दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे, अशी घोषणा फाउंडेशनने केली आहे.माटूंगा येथील वीर रमेश दडकर मैदानात अंध गोविंदांचा थर रचण्याचा सराव सुरू आहे. प्रशिक्षक नंदू धुरंधर आणि प्रसाद गायकवाड हे गोविदांना प्रशिक्षण देत आहेत. गतवर्षी चार थरांची सलामी देणारे अंधांचे गोविंदा पथक या वर्षी पाच थरांसाठी प्रयत्न करणार आहेत. मुंबईतील विविध ठिकाणी होणाऱ्या सराव शिबिरांसह दहीहंडीच्या दिवशी जी रक्कम जमा होईल त्या रकमेतील १० टक्के रक्कम दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील गोविंदा पथकांनीदेखील पुढाकार घेऊन दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत करावी, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष पोन्नअलगर देवेंद्र यांनी केले आहे.गतवर्षी हंडीद्वारे प्राप्त रकमेतून फाउंडेशनने अंध मुलांसाठी विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ही परंपरा या वर्षीही कायम ठेवण्याचा त्यांचा मानस आहे, असे सचिव शार्दुल म्हाडगूत यांनी सांगितले.
अंध गोविंदांची दुष्काळग्रस्तांना मदत
By admin | Updated: September 1, 2015 01:43 IST