जमीर काझी, मुंबईमहानगरातील पूर्व व पश्चिम उपनगरात रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांसाठी एक खूशखबर आहे. गेल्या काही वर्षांपासून केवळ कागदावर राहिलेल्या वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) ते चुनाभट्टीपर्यंतचा मार्ग जोडणाऱ्या पुलाच्या कामाला आता लवकरच ‘मुहूर्त’ मिळणार आहे. मुंबईतील व्यापारी क्षेत्र म्हणून झपाट्याने विस्तारित होत असलेल्या बीकेसीतून पूर्व उपनगरात येण्यासाठीच्या पूल बांधण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर सुरुवात केली जाणार आहे. त्यासाठी सात कंपन्यांनी तयारी दर्शविली आहे.विशेष म्हणजे १.६ किलोमीटर अंतराच्या पुलासाठी मिठी नदीमध्ये एक पिलर (खांब) टाकण्यासाठी केंद्रीय पर्यावरण विभागाने हिरवा कंदील दर्शविला आहे. त्यामुळे केबलद्वारे प्रकल्प पूर्ण करण्याच्या पूर्वीचे नियोजन रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च ५८ कोटींनी कमी झाला आहे. २०३ कोटींमध्ये हे काम पूर्ण केले जाणार असल्याचे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील (एमएमआरडीए) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.पंधरवड्यामध्ये या प्रकल्पासाठी आलेल्या निविदांचे मूल्यांकन करून प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीमध्ये मांडण्यात येणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पुलाच्या कामाबाबतचा आदेश (वर्क आॅर्डर) प्राधिकरणाकडून जारी केला जाणार आहे. सुरुवातीला मिठी नदीच्या पात्रावरून केबलद्वारे पूल उभारण्याचे नियोजन होते. मात्र पर्यावरण खात्याने पात्रादरम्यान एक पिलर बांधण्याला परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रकल्पाचा खर्च २६१ कोटींवरून २०३ कोटींत पूर्ण केला जाईल.
बीकेसी-चुनाभट्टी पूल लवकरच
By admin | Updated: August 4, 2014 01:47 IST