Join us

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूबाबत अधिक सावधगिरी बाळगावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:12 IST

पशुसंवर्धनमंत्री सुनील केदारलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूबाबत अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी ...

पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बर्ड फ्लूबाबत अधिक सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. पोल्ट्री व्यावसायिकांनी या संदर्भातील सर्व माहिती तातडीने प्रशासनाला द्यावी. लोकांच्या जीविताचा प्रश्न असल्याने हयगय करू नये, असे आवाहन पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी सोमवारी केले.

बर्ड फ्लूचा राज्यात शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर साेमवारी मंत्रालयात माध्यमांशी संवाद साधताना केदार म्हणाले की, २००६ साली राज्यात बर्ड फ्लू आला होता. तेव्हाही राज्याने केंद्र सरकारच्या मदतीची वाट न पाहता तातडीने पावले उचलली होती. यंदा कोरोनाचा संसर्ग असल्याने अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. सातत्याने परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. मानवाला संसर्ग होऊ नये यासाठी अंडी आणि कोंबडी ७० अंश सेल्सियसवर किमान अर्धा तास शिजवून खावे. अर्धा तास शिजवल्यानंतर हे विषाणू नष्ट होतात, हे वैज्ञानिकदृष्ट्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. शिवाय, कोणीही बर्ड फ्लूबाबत अफवा पसरवू नये. मागे कोंबडी खाल्याने कोरोना होतो, अशी अफवा पसरविली गेली. त्यावेळी सायबर सेलकडे तक्रार करून आम्ही कारवाई केली होती. आताही कोणी अफवा पसरविण्याचा प्रयत्न करू नये, असेही केदार यांनी सांगितले.

बर्ड फ्लूमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात आला आहे. ग्रामीण भागातील विकासासाठी राज्यातील महाविकास सरकार कायमच कटिबद्ध राहिले आहे. बर्ड फ्लूच्या संकटाचा सामना करताना शेतकरी, पोल्ट्री व्यावसायिकांच्या सोबत सरकार खंबीरपणे उभे आहे. आवश्यक ती मदत या घटकापर्यंत पोहोचविली जाईल. आम्ही कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही केदार यांनी दिली. दरम्यान, केंद्र सरकारने या प्रश्नांबाबत आणखी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. बर्ड फ्लूसारख्या विषाणूंबाबत तपासणीसाठी राज्यात अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आली आहे. मात्र, केंद्र सरकारकडून त्याला अद्याप मान्यता मिळाली नाही. त्याला तातडीने मान्यता दिल्यास प्रत्येकवेळी भोपाळला नमुने पाठविण्याची आवश्यकता भासणार नाही. शिवाय, पोल्ट्री व्यवसायात बर्ड इन्शुरन्ससाठी केंद्र सरकारने बँका, विमा कंपन्यांच्या माध्यमातून अधिक सक्षम व्यवस्था उभारण्याची आवश्यकता असल्याचेही मंत्री केदार म्हणाले.