मुंबई : टाटा कंपनीला शहरात वीजपुरवठ्याचा परवाना मिळाल्याने झटका बसलेल्या बेस्टपुढे आणखी एक मोठी अडचण उभी राहिली आहे़ उत्पन्न वाढविण्याचे पर्याय बंद होत गेल्यामुळे तिजोरीत खडखडाट झाला आहे़ त्यामुळे अर्धा महिना उलटूनही बेस्टच्या ४२ हजार कर्मचार्यांना वेतनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे़ आर्थिक संकटात सापडलेली बेस्टची गाडी रस्त्यावर ठेवण्याचे सर्वच प्रयत्न जवळपास निष्फळ ठरले़ यातून बाहेर पडण्यासाठी बेस्टने मुंबई महापालिकेकडून १,६०० कोटींचे कर्ज घेतले़ तसेच वीज दरवाढ व निवडणुकीच्या काळात पालिकेकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या हमी मिळाली होती़ मात्र सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने १०० कोटींवर बोळवण केली़ त्यातच टाटा कंपनीला मुंबई शहरात स्वस्त वीज वितरणाचा परवाना मिळाला़ त्यामुळे बेस्ट उपक्रमाचे उत्पन्नाचे स्त्रोतही धोक्यात आले आहेत़ परिणामी मे महिन्याचा पंधरवडा उलटूनही अद्याप ४२ हजार कामगारांना पगार मिळालेला नाही़ निम्मा महिना पगाराविना गेल्यामुळे बेस्टचे कर्मचारी हवालदिल झाले आहेत़ (प्रतिनिधी)
बेस्ट कामगारांचा पगार रखडला
By admin | Updated: May 19, 2014 05:45 IST