मुंबई : आर्थिक अफरातफर आणि महाघोटाळ्यांमुळेच बेस्टवर संकट ओढावले आहे़ या घोटाळ्यांची गंभीर दखल घेऊन भ्रष्ट अधिकाऱ्यांवर वेळीच कठोर कारवाई केली असता हातात भिकेचा कटोरा घेऊन राज्य सरकार आणि महापालिकेच्या दारात उभे राहण्याची वेळ बेस्टवर आली नसती, असे खडे बोल विरोधी पक्षनेत्यांनी सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीला पालिकेच्या महासभेत आज सुनावले़बेस्ट उपक्रमाच्या सन २०१५-१६ या आर्थिक वर्षातील अर्थसंकल्पावर पालिका महासभेत आजपासून चर्चा सुरू झाली़ या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी आपल्या भाषणातून बेस्टला आर्थिक खड्ड्यात घालणाऱ्या घोटाळ्यांचा पाढा सभागृहापुढे वाचला़ यामध्ये इलेक्ट्रीक सबस्टेशन्स व रिसिव्हिंग सबस्टेशन्स, कैझन बसपास, वातानुकूलित किंगलाँग बस, के़एल़जी़ सिस्टेल, वीज मीटर, कॅनेडियन वेळापत्रक अशा घोटाळ्यांचा समावेश आहे़ फेब्रुवारी आणि एप्रिल २०१५ अशी प्रत्येकी एक रुपयाची दोन भाडेवाढ मुंबईकरांवर लादण्यात येत असताना बेस्ट उपक्रमाची तूट भरून काढण्यासाठी मालमत्ता करामध्ये परिवहन उपकर लागू करण्याचे घाटत आहे़ सत्ताधारी पक्षाकडे दूरदृष्टी व नियोजनाचा अभाव असल्यामुळेच बेस्टची ही अवस्था झाल्याचा हल्लाबोल आंबेरकर यांनी आपल्या भाषणातून केला़ (प्रतिनिधी)