आविष्कार देसाई, अलिबागप्रत्येकाला शिक्षणाचा हक्क प्राप्त झाल्याने शिक्षणापासून कोणीच वंचित राहू नये असे सरकारचे धोरण आहे. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात सोमवारपासून होत असून जिल्ह्यात तीन हजार ८२२ शाळांची घंटा वाजणार आहे. पाच लाख १७ हजार ४१ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील शाळांचा परिसर दुमदुमणार आहे.जिल्हा परिषदेंतर्गत शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची जोरदार तयारी करण्यात आली आहे. खाजगी शाळांनीही पहिलीमध्ये प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबाचे फूल देऊन करण्याचे योजिले आहे. काही शाळांनी तर विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना शाळेमध्ये येण्यास प्रोत्साहित केले आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन वह्या, पुस्तके, नवे मित्र-मैत्रिणी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांचीही उत्कंठा ताणली गेल्याचे चित्र आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध होतील, असा विश्वास शिक्षण विभागाने व्यक्त केला आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या दोन हजार ८३७ शाळा आहेत. तर नगरपालिकेच्या ८५, खासगी अनुदानित ३९०, खासगी विनाअनुदानित ४८९ आणि राज्य व केंद्र सरकारच्या २१ अशा एकूण तीन हजार ८२२ शाळा आहेत. या शाळांमधील पहिली ते बारावी वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या पाच लाख १७ हजार ४१ आहे. शिक्षण विभागाने गुणवत्ता वाढीसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. शाळा सुरु होण्याआधी शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात आले आहे. १ एप्रिलपासूनच पहिलीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. जिल्हा परिषदेच्या दोन हजार १११ शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु करण्यात आले असल्याने पटसंख्येत पाच हजारांनी वाढ होण्याचा विश्वास शिक्षण विभागाला आहे. राज्य सरकारमार्फत ‘शाळाबाह्य विद्यार्थीरहित महाराष्ट्र’ हा उपक्रम राबविण्यात येणार असून ४ जुलै रोजी सकाळी सात ते सायंकाळी सात या कालावधीत शाळाबाह्य विद्यार्थी शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.
शाळांची घंटा आज वाजणार
By admin | Updated: June 14, 2015 23:33 IST