नवी मुंबई : सीबीडी - बेलापूर स्टेशनच्या बाहेरचे पथदिवे गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने रात्रीच्या वेळी प्रवाशांची गैरसोय होत आहे. शेजारीच सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पासाठी रात्रभर मोठमोठे दिवे सुरू असताना स्टेशन परिसरातील पथदिवे बंद का ठेवले जातात, अशा प्रश्न प्रवाशांनी केला आहे. महावितरणने या परिसरातील विजेचा प्रश्न सोडवलेला नाही. रेल्वे स्थानकाबाहेर पडताच तीव्र काळोखामुळे प्रवाशांना मोबाइलचा टॉर्च किंवा बॅटरीचा आधार घ्यावा लागतो. पार्किंग झोनमध्येही अंधाराचा सामना करावा लागतो. स्टेशनच्या आवारात येणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांच्या प्रकाशातच रोज मार्ग काढावा लागतो, अशी तक्रार महिला प्रवाशांनी केली आहे. जवळपासच्या परिसरात कित्येक वेळा दुपारपर्यंत पथदिवे सुरूच राहतात असा हा महावितरणचा विचित्र कारभार पाहता त्यांनी परिस्थितीकडे लक्ष घालावे, अशी प्रवाशांची मागणी आहे.
बेलापूर स्टेशनचा परिसर अंधारात
By admin | Updated: June 27, 2015 01:25 IST