Join us

शहराला भिकाऱ्यांचा विळखा

By admin | Updated: June 16, 2015 01:10 IST

या विकसित शहरात भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहारातील रिक्षा, मोटारसायकल, खाजगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना

प्राची सोनवणे, नवी मुंबईया विकसित शहरात भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहारातील रिक्षा, मोटारसायकल, खाजगी वाहनांमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांना या भिकाऱ्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. शहरातील पदपथ, रेल्वे स्टेशन परिसर, बसथांबे, धार्मिक स्थळे, सिग्नल या सर्वच परिसराला भिकाऱ्यांनी विळखा घातला आहे.एकीकडे अनधिकृत बांधकाम, झोपडपट्टी वसाहत, अतिक्र मणे यासारख्या नवी मुंबई शहराच्या सौंदर्याला बाधक ठरणाऱ्या गोष्टींवर कारवाई केली जात आहे. तर, दुसरीकडे नागरिकांवर अरेरावी करणाऱ्या भिकाऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. नवी मुंबईचा झपाट्याने होणारा विकास पाहता या शहरातील उदरनिर्वाहाचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे भीक मागणे असे या लोकांना वाटू लागल्याने या लोकांनी या शहरातच आपले बस्तान मांडले आहे. एका सिग्नलवर १५ ते २० च्या संख्येने भिकारी पहायला मिळतात, त्यामध्येही लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. या भिकाऱ्यांमध्येही दिवसा आणि संध्याकाळी नवे चेहरे पहायला मिळतात. रात्रीच्या वेळी एखादा फेरफटका मारला तर शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, उड्डाणपूल, पदपथ तसेच रस्त्याच्या कडेला झोपलेले भिकारी पहायला मिळतात. सीबीडी उड्डाणपूल, दारावे, नेरूळ रेल्वे स्थानक, एपीएमसी मार्केट, तुर्भे पीडब्ल्यूडी उड्डाणपूल, तुर्भे नाका, वाशी या ठिकाणी भिकाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. नवी मुंबई महानगरपालिका, सिडको, नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई वाहतूक पोलीस यापैकी कोणीही याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भात पोलिसांकडे तक्रार केली असता हे काम आमचे नाहीच अशी सबब सांगण्यात येते. बेगर्स अ‍ॅक्टखाली कारवाई करून या सगळ्यांवर निर्बंध घालता येऊ शकतो मात्र शासकीय व्यवस्था यादृष्टीने कोणतेही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही. कोणतीही कारवाई होत नसल्याने भिकारी आणि भीक मागायला लावणाऱ्या व्यावसायिकांचा धंदा सध्या तेजीत सुरू आहे. वर्दळीच्या ठिकाणी लहान-लहान मुलांना भीक मागण्यासाठी प्रवृत्त केले जाते. या मुलांना रस्त्यातून बाजूला सारले तर मग ते आरडाओरड, रडारड करतात त्यामुळे वाहतुकीस आणखीणच अडथळे येतात. या भिकाऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळे येऊ नये यासाठी प्रत्येक परिसरातील भिकाऱ्यांच्या टोळीवर आठवड्याभरात कारवाई केली जाईल असे वक्तव्य नवी मुंबई वाहतूक उपायुक्त अरविंद साळवे यांनी केले.