नवी मुंबई : नवी मुंबई परिसरात भिकाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिध्द होताच त्याची दखल घेऊन नवी मुंबई आयुक्तालयाच्या परिमंडळ - १ च्या हद्दीत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांनी मंगळवारी भिकाऱ्यांना ताब्यात घेतले. बेगर्स अॅक्टअंतर्गत कारवाई करून यामधील प्रौढ भिकाऱ्यांची चेंबूरच्या वेल्फेअर सेंटरमध्ये रवानगी करण्यात आली. लहान मुलांची रवानगी भिवंडी येथील बालसुधारगृहात करण्यात आली. रबाळे, रबाळे एमआयडीसी, कोपरखैरणे, वाशी, एपीएमसी, तुर्भे, तुर्भे एमआयडीसी, नेरूळ, सीबीडी, एनआरआय या एकूण दहा परिसरांतून भिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यापैकी रबाले, रबाले एमआयडीसी, कोपरखैरणे, एपीएमसी, तुर्भे एमआयडीसी, सीबीडी आणि एनआरआय परिसरात एकही भिकारी पोलिसांना आढळला नाही, ही आश्चर्यजनक बाब आहे. भिकाऱ्यांचा उपद्रव, दिवसेंदिवस वाढती त्यांची संख्या पाहता या सगळ््याचा फटका स्थानिक नागरिक, प्रवाशांना बसत आहे. प्रत्येक परिसरातील भिकाऱ्यांच्या अरेरावीमुळे नागरिक, प्रवासी हैराण झाले आहेत. पैसे मिळाल्याशिवाय पाठलाग न सोडणारे हे भिकारी ही नागरिकांसाठी मोठी समस्या बनली आहे.फक्त एकच दिवस भिकाऱ्यांवर कारवाई करून हा प्रश्न सुटणार नसून यावर काही ठोस उपाययोजना केल्या पाहिजेत. भिकाऱ्यांमधील लहान मुलांच्या वाढत्या संख्येकडे गांभीर्याने लक्ष घालून भीक मागायला लावणाऱ्या टोळींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी, असे मत इथल्या नागरिकांनी व्यक्त केले आहे. सिडको, नवी मुंबई महानगरपालिका, नवी मुंबई पोलीस आणि नवी मुंबई वाहतूक पोलीस यांनी या समस्येवर लवकरात लवकर तोडगा काढून भिकाऱ्यांच्या उपद्रवाला वेळीच आळा घालावा, अशी नागरिकांची मागणी आहे. कायदेशीर कारवाई होणार नवी मुंबईमधील प्रत्येक परिसरात आढळणाऱ्या भिकाऱ्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करण्याचे काम सुरू आहे. एका दिवसातच वाशी परिसरातील ९, तुर्भे येथील ३, नेरूळ परिसरातील ९ अशा एकूण २१ भिकाऱ्यांवर बेगर्स अॅक्टखाली कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशीच कारवाई केली जाणार असून नागरिकांना तसेच प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही यासाठी नवी मुंबई वाहतूक पोलिसांकडून सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाईल - शहाजी उमाप, पोलीस उपायुक्त, (नवी मुंबई, वाहतूक पोलीस, झोन -१)
शहरात भिकाऱ्यांची धरपकड
By admin | Updated: June 18, 2015 01:07 IST