चिकणघर : यंदा फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लग्नसराईचा हंगाम असूनही फुलांचे दर घसरले आहेत. मात्र, मोगऱ्याचे दर गतवर्षीपेक्षा १०० रुपयांनी किलोमागे वाढून ४०० रुपये झाले आहेत. पिवळा झेंडू आॅक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान ६० रुपये किलो होता. तो आता ३०-३५ रुपयांपर्यंत खालावला आहे. कलकत्ता गोंडा झेंडूचा दर ८० वरून ४० रुपयांवर स्थिरावला आहे. कल्याणच्या होलसेल फुलमार्केटचे हे दर असून दररोज येथे ५० ते ६० ट्रक फुलांची विक्री होते. गेल्या वर्षी लग्नसराईत फुलांना चांगला भाव मिळाल्याचे बघून यंदा शेतकऱ्यांनी फुलांच्या शेतीत वाढ केली. मात्र, मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने फुलांचे भाव ३० ते ४० रुपयांवर घसरले आहेत. मात्र, मोगऱ्याने शेतकऱ्यांना दिलासा दिला. लग्नसराईमुळे मोगऱ्याला मागणी वाढली असल्याने चांगला भाव मिळत असल्याचे विक्रेते सांगतात. गुलाबाच्या २० फुलांचे बंडल १५० रुपयांना मिळत आहे. फुलांचा पुरवठा वाढला असला आणि मागणी नसली तरी वेणी, गजरे आणि वधूवरांच्या हारांच्या किमती मात्र दुप्पट झाल्या आहेत. वधूवरांचे हार १५०० ते २००० रुपयांना मिळत आहेत.
आवक वाढल्याने झेंडूच्या किमती घसरल्या
By admin | Updated: May 14, 2015 00:09 IST