मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ग्लोबल वॉर्मिंगबरोबरच एक नवी समस्या महासागरांना भेडसावू लागली आहे. २०२१ मध्ये १७ दशलक्ष मेट्रिक टनांहून अधिक प्लास्टिक कचरा जगाच्या महासागरात टाकला गेला. २०४० पर्यंत हे प्रमाण दुप्पट ते तिप्पट होणार असून संयुक्त राष्ट्राच्या अभ्यासानुसार २०५० पर्यंत समुद्रात माशांऐवजी प्लास्टिकचे प्रमाण जास्त होणार आहे, असा इशारा रत्नागिरी येथील मत्स्य महाविद्यालयाच्या मत्स्य जीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी दिला. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून डॉ. मोहिते यांच्याशी सागरी पर्यावरणाबाबत ‘लोकमत’ने संवाद साधला.
त्या म्हणाल्या, प्लास्टिकमुळे महासागर गुदमरतो आहे. दरवर्षी अंदाजे ८ दशलक्ष टन प्लास्टिक समुद्रात येऊन पडते. त्यामुळे सागरी जीवांची हानी होत आहे. या प्लास्टिकरूपी भस्मासुरामुळे मासेमारी व्यवसायही धोक्यात आला आहे. ‘मायक्रो प्लास्टिक्स’चे ५ मिमी पेक्षा लहान तुकडे समुद्राच्या पाण्यात आढळतात. आपणच टाकत असलेल्या प्लास्टिकच्या विघटनातून ते निर्माण होतात. प्लँक्टनसारख्या लहान समुद्री जीवांबरोबरच व्हेल, डॉल्फिन्ससह अनेक मासे, कासव, समुद्र पक्षी यांच्या पोटात हे मायक्रो प्लास्टिक खाद्याबरोबर पोहोचते आणि त्यांचा मृत्यू होतो, अशी माहिती डॉ. मोहिते यांनी दिली.
जाळ्यातही आता अडकते प्लास्टिक!
पूर्वीच्या काळी कोळी बांधवांना किनाऱ्याजवळ अवघ्या २ तासांत २ दिवस पुरवठा होईल इतकी मासळी जाळ्यात मिळत असे पण हल्ली फक्त किनाऱ्यावरच नव्हे तर खोल समुद्रातही जाळ्यात माशांपेक्षा प्लास्टिक कचराच अधिक सापडतो. बदलत्या हवामानामुळे आधीच समुद्रात चक्रीवादळाचे प्रमाण वाढले आहे, मत्स्य दुष्काळाची समस्या वाढली आहे आणि आता प्लास्टिक प्रदूषणाने मच्छिमार हवालदिल झाला आहे, अशी चिंता अखिल कोळी समाज व संस्कृती संवर्धन संघाचे मुंबई अध्यक्ष मोहित रामले यांनी दिली.