Join us  

रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीचा फेरविचार व्हावा, त्याऐवजी सुचविण्यात आले 'हे' तीन पर्याय...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 7:41 PM

रिक्षा युनियननेसुद्धा सद्यस्थितीत भाडेवाढ करू नये अशी मागणी केली आहे व त्यासाठी तीन पर्याय देखील सुचविण्यात आले आहेत.

रिक्षा आणि टॅक्सीच्या सुरुवातीच्या भाड्यात ३ रुपयांनी वाढ आणि पुढील प्रत्येक किलोमीटर साठी रिक्षा भाड्यात रु. २.०१ आणि टॅक्सी भाड्यात रु. २.०९ वाढ सुचवणाऱ्या निर्णयाचा शासनाने पुनर्विचार करावा अशी मागणी मुंबई ग्राहक पंचायतीचे कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री अॅड.अनिल परब यांना एका पत्राद्वारे केली आहे. सदर भाडेवाढ १ मार्चपासून अंमलात येणार असून मीटर कॅलिब्रेशनसाठी तीन महिन्यांचा अवधी दिला जाणार आहे.

गेल्या पाच वर्षांहून जास्त कालावधीत रिक्षा, टॅक्सी भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे ही भाडेवाढ अनिवार्य होती यात शंका नाही. रिक्षा, टॅक्सी मालक/चालकांना सुद्धा सध्याच्या बिकट परिस्थितीत आर्थिक साहाय्याची गरज आहे यातही वाद नाही. परंतू कोरोनामुळे संपूर्ण अर्थचक्रच ठप्प झाल्याने अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून बऱ्याच जणांना पगार कपातीला तोंड द्यावे लागत आहे. सर्वसामान्य ग्राहकांची एकूण क्रयशक्तीच मोठ्या प्रमाणावर खालावल्याने सुरुवातीच्या भाड्यातच थेट तीन रुपये भाडेवाढ आणि त्यानंतर प्रती किलोमीटरसाठी दोन रुपयांहून अधिक इतकी दरवाढ ही ग्राहकांच्या हालअपेष्टांत सद्यस्थितीत अधिकच भर घालणारी आहे. परीणामत: ग्राहकांचा दैनंदिन रिक्षा, टॅक्सी वापर साहजिकच मोठ्या प्रमाणावर कमी होईल. आणि त्यामुळे रिक्षा, टॅक्सी मालक, चालकांना ‌दिलासा देण्याचा शासनाचा जो मूळ उद्देश आहे तो उद्देशच अशा अवाजवी आणि अकाली भाडेवाढीमुळे सफल होऊ शकणार नाही. किंबहुना हे वास्तव जाणूनच खुद्द रिक्षा युनियननेसुद्धा सद्यस्थितीत भाडेवाढ करू नये अशी मागणी केली आहे. 

शासनाला खालील तीन पर्याय सुचवले आहेत:१. सद्य परिस्थिती ही कोणत्याही प्रकारच्या भाडेवाढीस योग्य नसल्याने रिक्षा, टॅक्सीची १ मार्चपासून लागू होणारी दरवाढ सहा महिने पुढे ढकलावी.

२. अथवा रिक्षा, टॅक्सी चालकांना भाडेवाढीद्वारे त्यांच्या उत्पन्नात वाढ करुन देण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रस्तावित भाडेवाढ ही ग्राहकांनासुद्धा सुसह्य होईल याची शासनाने काळजी घ्यावी आणि त्यासाठी सदर भाडेवाढ ही दोन ‌टप्प्यात करुन १ मार्चपासून पुढील वर्षासाठी रिक्षा आणि टॅक्सीच्या मूळ भाड्यात एक रुपया भाडेवाढ आणि पुढील‌ प्रत्येक किलोमीटर साठी ७५ पैसे वाढ लागू करावी. उर्वरित भाडेवाढ ही एक वर्षाच्या कालावधीनंतर करण्यात यावी.     

३. अथवा केवळ मूळ भाड्यात २ रुपये सरसकट भाडेवाढ करुन पुढील प्रती किलोमीटर २ रु. १ पैसा आणि २ रु. ९ पैसे ही दरवाढ येत्या वर्षभरासाठी स्थगित करावी असे तीन पर्याय शासनाला सुचविलेच आहेत.

एकंदरीत परिस्थितीचा साधक, बाधक विचार करुन रिक्षा, टॅक्सी भाडेवाढीच्या निर्णयाबाबत वरील तीन पर्याय लक्षात घेऊन शासनाने फेरविचार करावा अशी विनंती मुंबई ग्राहक पंचायतीने परिवहन मंत्र्यांना केली असल्याचे अँड.शिरीष देशपांडे यांनी लोकमतला सांगितले.

टॅग्स :ऑटो रिक्षाटॅक्सीमुंबई