Join us  

Aryan Khan Drug Case: आर्यनचं भविष्य वाचवायचं असेल तर..; आठवलेंचा शाहरुखला मोलाचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 8:52 AM

Aryan Khan Drug Case: आर्यन खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला; आठवलेंचा शाहरुखला सल्ला

मुंबई: क्रूझ शिप पार्टी प्रकरणात (Cruise Drugs Party Case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB) तीन आठवड्यांपूर्वी अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) अटक केली. आर्यन खानला जामीन मिळत नसल्यानं त्याचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी शाहरुखला मोलाचा सल्ला दिला आहे.

आर्यन खानला पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचा सल्ला आठवलेंनी शाहरुखला दिला आहे. 'तरुण अवस्थेत अंमली पदार्थांचं सेवन करणं चांगलं नाही. अद्याप आर्यनपुढे पूर्ण भविष्य पडलंय. शाहरुखनं आर्यनला मंत्रालयाशी संबंधित पुनर्वसन केंद्रात पाठवावं,' असं आठवले म्हणाले. 'आर्यनला तुरुंगाऐवजी १ ते २ महिने पुनर्वसन केंद्रात ठेवायला हवं. देशात अनेक पुनर्वसन केंद्रं आहेत. तिथे एक ते दोन महिने राहिल्यास आर्यनची अंमली पदार्थांचं व्यसन सुटेल', असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केला.

क्रूझ शिपवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंच्या कामाचं रामदास आठवलेंनी कौतुक केलं. 'आर्यन खानकडून किमान ५ ते ६ वेळा जामिनासाठी अर्ज करण्यात आला. मात्र तो फेटाळला गेला. एनसीबीकडे पूर्ण ताकद असल्याचं यावरून समजतं. आर्यनची अटक बेकायदेशीर असल्याचं म्हणणं चुकीचं ठरेल', असं आठवले म्हणाले.

एनसीबीनं क्रूझवर टाकलेल्या छाप्यात आपल्याकडे कोणत्याही प्रकारचे अंमली पदार्थ मिळत नसल्याचा दावा आर्यन खानकडून न्यायालयात करण्यात आला. अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांच्याशिवाय कोणालाही आपण ओळखत नसल्याचं आर्यनकडून सांगण्यात आलं. या प्रकरणात एनसीबीनं आतापर्यंत जवळपास २० जणांना अटक केली आहे.

टॅग्स :रामदास आठवलेआर्यन खानशाहरुख खाननार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो