नायगांव : समुद्रातील नेव्हिगेशन वे अर्थात बोटी जाण्याचा मार्ग या मार्गात असलेले खडक काढण्यासाठी दिलेले काम कंत्राटदाराने अपूर्ण स्थितीत सोडल्याने अर्नाळा येथील सागरी मार्ग धोकादायक स्थितीत आलेला आहे. अपूर्ण खडक फोडून ते या भागात पसरल्याने पूर्वीपेक्षाही या भागात अपघाताची शक्यता वाढली आहे. दातिवरे चॅनल गेटजवळ हे काम सुरू होते. दि. १४ जुलै २०१२ रोजी या विकासकामाची प्रक्रिया सुरू झाली होती. २ कोटी ६८ लाख रुपयांची तरतूद या कामाकरिता करण्यात आली होती. अंकिता एंटरप्रायझेस डहाणू या खाजगी कंपनीला सदर खडक हटविण्यासाठी ठेका देण्यात आला होता.प्रत्यक्षात अपूर्णावस्थेत खडक फोडून कंत्राटदार गायब झाला. मासेमारी बंद झाल्याने याच मार्गातून बोटी परतू लागल्याने अपघाताचा धोका ओळखून स्थानिक मासेमारी करणार्या तब्बल १५ बोटींनी हा खडक येथून वाहतूक करून अन्यत्र हलवला. पाचुबंदर येथील सेंट पीटर या बोटीला अशाच कारणामुळे उचन नजीक अपघात झाला होता. यात लाखो रुपयांचे नुकसान होवून बोटही निकामी झाली. अर्नाळा येथे हा धोका कायम आहे. सदर भागात त्वरित कारवाईची मागणी स्थानिक मच्छिमारांनी केली आहे. सदर भागाची पाहणी केल्यानंतर वस्तुस्थिती समजली. येत्या दिवसात कारवाई करण्यात येईल.
अर्नाळा नेव्हिगेशन वे धोकादायक
By admin | Updated: May 22, 2014 04:01 IST