मुंबई : भायखळा पूर्वेकडील घोडपदेव परिसरात १५ दिवसांपूर्वीच सुरू झालेली कचरा संकलन करणारी घंडागाडी पाच दिवसांपासून बंद आहे. कारण या घंटागाडीवरून स्थानिक शिवसेना नगरसेवक रमाकांत रहाटे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभागाध्यक्ष संजय नाईक यांच्यात राजकारण रंगले आहे. मात्र त्याचा नाहक त्रास स्थानिकांना सहन करावा लागत आहे.याबाबत नाईक म्हणाले की, घोडपदेव परिसरातील पेटीवाला चाळ, वाळुंजकराची चाळ, चास्कर चाळ आणि नजीकच्या बैठ्या चाळींतील रहिवाशांना कचरा टाकण्यासाठी परिसरात कचरापेटी नाही. परिणामी येथील बहुतांश रहिवाशांना रस्त्यावरच कचरा टाकण्याशिवाय पर्याय नाही. मात्र त्यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य असून साथीचे रोग पसरत आहेत. त्याची दखल घेत परिसरात घंडागाडी सुरू करण्यासाठी पालिका साहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले. मात्र ई वॉर्डमधील बहुतेक परिसरांत घंटागाडी सुरू करण्यासाठी निविदा काढल्याचे कारण देत त्यांनी तत्काळ गाडी सुरू करता येणार नाही, असे सांगितले. लोकांची अडचण दूर व्हावी म्हणून तात्पुरत्या स्वरूपावर गाडी कचरा संकलन करण्यासाठी सुरू केल्याचे नाईक यांनी सांगितले. मात्र रहाटे यांंनी नगरसेवक हद्दीचा वाद पुढे करत घंटागाडी बंद केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे परिसरात पाच दिवसांपासून घंटागाडी बंद झाली आहे. शिवाय रहिवासी पुन्हा रस्त्यावरच कचरा टाकू लागले आहेत. परिणामी परिसरात पुन्हा दुर्गंधी पसरू लागली आहे.यावर स्थानिक नगरसेवक रमाकांत रहाटे म्हणाले की, स्थानिक नगरसेवकाला कोणतीही पूर्वकल्पना न देता नाईक यांनी कचरा संकलन करण्यासाठी खासगी गाडी सुरू केली होती. मात्र त्या गाडीवर महापालिकेचे चिन्ह होते. शिवाय नाईक यांच्या कार्यकर्त्यांनी परिसरात महापालिकेची गाडी सुरू केल्याबाबत आभारप्रदर्शन करणारे बॅनरही झळकावले होते. त्यामुळे लोकांनी गरज असेल तर तत्काळ पालिकेतर्फे घंडागाडी सुरू करणार असल्याचे रहाटे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘घंटागाडी’वरून सेना-मनसेत ‘तंटा’!
By admin | Updated: August 5, 2015 00:10 IST