Join us  

ओला-उबर चालकांकडून मनमानी कारभार, प्रवाशांचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2021 6:29 AM

प्रवासी त्रस्त; भाडे नाकारण्याचे प्रकार वाढले, समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया

ठळक मुद्देॲपवरून कॅब बुक केल्यानंतर प्रवाशांना ओटीपी प्राप्त होतो. तो दिल्याशिवाय संबंधित प्रवाशाला कोठे सोडायचे आहे, याची माहिती चालकाला मिळत नाही

मुंबई : एकेकाळी किफायतशीर दरात आरामदायी सेवा देण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ओला-उबरविरोधात प्रवाशांनी उघड नाराजी व्यक्त करण्यास सुरूवात केली आहे. या खासगी कॅबच्या चालकांकडून मनमानी कारभार सुरूच असून, भाडे नाकारण्याचे प्रकार वाढल्याने प्रवासी त्रस्त झाले आहेत. याबाबत समाजमाध्यमांवर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

ॲपवरून कॅब बुक केल्यानंतर प्रवाशांना ओटीपी प्राप्त होतो. तो दिल्याशिवाय संबंधित प्रवाशाला कोठे सोडायचे आहे, याची माहिती चालकाला मिळत नाही. मात्र, लांब पल्ला वा वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी चालकांनी नवी शक्कल शोधून काढली आहे. बुकिंग कॉल प्राप्त होताच प्रवाशाला फोन करून त्याच्या प्रवासाचे ठिकाण विचारायचे आणि ते सोयीस्कर नसल्यास काहीतरी कारणे देत भाडे नाकारायचे असे प्रकार हल्ली सर्रास घडू लागल्याचे एका प्रवाशाने टविटरवर म्हटले आहे. दुसरी बाब म्हणजे प्रवाशाला गंतव्य स्थान आणि ॲरपवर दिसणारे भाडे विचारून कॅब मार्गस्थ करण्याचे प्रकारही वाढले आहेत. या प्रक्रियेत संबंधित कंपनीच्या ॲपवर ओटीपी टाकला जात नाही. त्यामुळे सर्व भाडेचालकाला मिळते; परंतु प्रवाशाने प्रवास केल्याची नोंद कंपनीकडे राहत नसल्याने प्रवासादरम्यान एखादा अनुचित प्रकार घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांच्या माध्यम समन्वयकांशी इमेलद्वारे संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

चालकांच्या व्यथाही वेगळ्याnयाबाबत काही चालकांशी संपर्क साधला असता त्यांनी गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, कंपनीकडून नफ्यातील मार्गिका आम्हाला दिल्या जात नाहीत. कंपनीच्या मालकीच्या गाड्यांना तेथे प्राधान्यक्रम दिला जातो. त्यामुळे खिशातील पैसे घालून व्यवसाय करावा लागत आहे. nविमानतळाचे भाडे लागले तर आणखीनच डोकेदुखी. कारण कंपनीकडून पार्किंग शुल्क मिळत नसल्याने ते पैसेही स्वत:लाच द्यावे लागतात. विमानतळावरील पार्किंगचे दर इतके वाढीव आहेत की ते परवडणारेच नाहीत.nहल्ली डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे पैसे थेट कंपनीकडे जमा होतात. त्यातील त्यांचा हिस्सा कापून उर्वरित रक्कम आमच्या खात्यात वळती होईपर्यंत बराच कालावधी लागत असल्याने अडचणींचा सामना करावा लागतो.

टॅग्स :ओलामुंबई