लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सध्या शिवसेना-भाजपचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असून, त्यात भाजपचे किरीट सोमय्या आघाडीवर आहेत. महाविकास आघाडीतील अनेक बड्या नेत्यांवर त्यांनी आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. सोमय्या हेतुपूर्वक बदनामी करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी त्यांच्याविरोधात उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी सोमय्या आपली प्रतिष्ठा मलिन करीत आहेत. त्यामुळे त्यांना बिनशर्त माफी मागण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी परब यांनी केली आहे.
भविष्यात आपल्याविरोधात असे कोणतेही वादग्रस्त वक्तव्य करण्यापासून सोमय्या यांना मनाई करावी, अशीही मागणी परब यांनी दाव्याद्वारे केली आहे. सोमय्या हे भ्रष्ट आणि गुन्हेगारी कार्यात अडकल्याचा खोटा आरोप करीत असल्याचे, परब यांनी दाव्यात म्हटले आहे. या दाव्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. गेल्याच आठवड्यात परब यांनी ॲड. सुषमा सिंग यांच्याद्वारे सोमय्या यांना नोटीस बजावली होती. मात्र, अद्याप सोमय्या यांनी त्या नोटिसला उत्तर दिलेले नाही.
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रिसॉर्ट बांधकामाबाबत झालेल्या घोटाळ्यात अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप सातत्याने सोमय्या सोशल मीडियाद्वारे करीत आहे. मे २०२१ पासून ते अशाप्रकारच्या बदनामीकारक पोस्ट करीत असल्याचे परब यांनी दाव्यात म्हटले आहे.
‘कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे’
आपले या रिसॉर्ट बांधकामाशी काहीही संबंध नाही. तरीही सोमय्या यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट मोठ्या प्रमाणावर सगळीकडे प्रसारित करण्यात आल्या, जेणेकरून माझी समाजात मोठ्या प्रमाणावर बदनामी होईल. सोमय्या यांनी केलेल्या खोट्या आरोपांबाबत सत्तेत असलेल्या ज्येष्ठांनी व सहकाऱ्यांनी तसेच पक्षाकडून व कुटुंबीयांकडून आपल्याला अनेक शंकांना सामोरे जावे लागले. दोन मिनिटाच्या प्रसिद्धीसाठी सोमय्या यांनी आपले नाव व प्रतिष्ठा मलिन केली. आपण एक नेते म्हणून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहोत, असे परब यांनी दाव्यात म्हटले आहे.