मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बनाव रचून करण्यात आलेल्या भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाविरुद्ध भाजपा कार्यकर्त्यांनी मंगळवारी कांदिवलीत रस्त्यावर उतरून निदर्शने केली. जनताही या आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील झाली. कांदिवली पूर्व झालेल्या आंदोलनात पोलिसांनी बळाचा वापर करून अटक केली असा आरोप भाजपा कार्यकर्त्यांनी केला. लोकशाही बुडवणाऱ्या या निर्णयाविरोधात आमदार अतुल भातखळकर यांच्या कांदिवली पूर्व विधानसभेत कार्यकर्ते काळे झेंडे घेऊन सकाळीच रस्त्यावर उतरले. वसुली सरकारचा निषेध असो, ठाकरे सरकार हाय, हाय अशा घोषणा देऊन त्यांनी संतप्त निदर्शने केली.
निलंबनाने जनतेतही असलेला आक्रोश यानिमित्ताने समोर आला. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना अटक केली. कांदिवली पूर्वसह मुंबईत अन्य ठिकाणीही राज्य सरकारच्या या कृत्याचा निषेध करण्यात आला. विधानसभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये शिवीगाळ केल्याचा ठपका ठेवून तालिका अध्यक्षांनी आमदार अतुल अतुल भातखळकर, योगेश सागर, आशिष शेलार, अभिमन्यू पवार, गिरीश महाजन, पराग अळवणी, राम सातपूते, हरीश पिंगळे, संजय कुटे, जय कुमार रावल, नारायण कुटे, बंटी भांगडिया या भाजपाच्या १२ आमदारांना निलंबित केले. शिवी शिवसेनेच्या आमदाराने घातली होती, अशी माहिती उघड झाली, परंतु ठपका मात्र भाजपा आमदारांवर ठेवण्यात आला. ‘हे ठरवून रचलेले कारस्थान होते. सरकारविरुद्ध सातत्याने आक्रमक असलेल्या आमदारांना हा बनाव रचून लक्ष्य करण्यात आले. त्यांना विधिमंडळाच्या कामकाजापासून दूर ठेवण्याचा हा डाव आहे. १७० आमदार हाताशी असून ठाकरे सरकारची तंतरली आहे’, अशी जळजळीत टीका करून आमदार अतुल भातखळकरांनी सरकारची खेळी उघड केली.