कंगनाची उच्च न्यायालयात याचिका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशद्रोहाचा आरोप असल्याने पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास पासपोर्ट प्राधिकरणाने नकार दिल्याने बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी उद्या (मंगळवार, १५ जून) राेजी होण्याची शक्यता आहे.
सोशल मीडियाद्वारे कंगना समाजात तेढ निर्माण करत असल्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आपण एक कलाकार असल्याने आपल्याला कामानिमित्त देशांतर्गत व परदेशात प्रवास करावा लागतो. १५ जून ते ऑगस्ट २०२१ दरम्यान एका चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परदेशात जायचे असल्याने पासपोर्ट नूतनीकरणासाठी पासपोर्ट प्राधिकरणाकडे अर्ज केला हाेता. मात्र, देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आल्याने प्राधिकरणाने पासपोर्टचे नूतनीकरण करण्यास नकार दिला. पासपोर्टची मुदत सप्टेंबर २०२१ मध्ये संपत आहे, असे कंगनाने याचिकेत म्हटले आहे. पासपोर्ट प्राधिकरणाने पासपोर्टचे नूतनीकरण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही कंगनाने याचिकेद्वारे केली आहे.
...................................