मुंबईः केरळमध्ये मुसळधार पावसाने आलेल्या महापुरात आजपर्यंत दोनशेच्यावर बळी गेले असून, हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. तसेच अडीच लाखांवर नागरिक बेघर झालेत. त्यामुळे केरळला सर्वच राज्यांकडून मदतीचा हात देण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारनेही तातडीची बैठक घेऊन 20 कोटी रुपये मदत जाहीर केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार आणि खासदारांनी केरळमधल्या पूरग्रस्तांना मदत देण्याची घोषणा केली आहे. आता भाजप नेते आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आपल्या 1 महिन्यांचा पगार केरळसाठी मदत म्हणून देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच इतरही आमदार-खासदारांना 1 महिन्याचा पगार देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
9 ऑगस्टनंतर 196 लोकांचा मृत्यू झाला तर, शनिवारी पुरात 22 लोक वाहून गेले. सध्या 6, 61,887 माणसांना 3466 रिलीफ कॅम्पमध्ये ठेवण्यात आलं आहे. घरदार, शेती सारेच नष्ट झाल्याने अनेक जण मानसिकरीत्या पुरते खचले आहेत, तर काहींच्या डोक्यावर परिणाम झाला आहे वा होत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. रुग्णालयात जखमींबरोबरच मानसिक आजारांनी ग्रासलेल्या लोकांची संख्या मोठी असून, त्यात केवळ वृद्धच नव्हे, तर तरुण व लहान मुलेही आहेत. शाळा, महाविद्यालये कित्येक दिवसांपासून बंद आहेत. रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची कमतरता भासत आहे.