Join us  

वांद्रेतील मजुरांच्या झुंडीने फुटला सर्व पक्षांच्या नेत्यांना घाम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 2:50 AM

मंगळवारच्या घटनेनंतर नेहमीप्रमाणे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्याची संधी साधली. एकीकडे राजकीय आरोपांना उत्तर देतानाच स्थिती हाताबाहेर जाणार नाही

मुंबई : मजुरांच्या झुंडीने मंगळवारी वांद्रे परिसरात ठिय्या मांडल्याने राजकीय वर्तुळाला चांगलाच धक्का बसला. पोलीस आणि प्रशासनाने काही तासांत हजारोंची गर्दी पांगवली. मात्र, या अचानक झालेल्या उद्रेकाने भाजपसह काँग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांची मोठी अडचण झाली. एकीकडे मतदारसंघातील स्थिती आटोक्यात आणायची आणि दुसरीकडे वरिष्ठांपर्यंत माहिती पोहोचवायची अशी दुहेरी कसरत या नेतेमंडळींना करावी लागली.

मंगळवारच्या घटनेनंतर नेहमीप्रमाणे राजकीय पक्ष आणि नेत्यांनी एकमेकांवर आरोप करण्याची संधी साधली. एकीकडे राजकीय आरोपांना उत्तर देतानाच स्थिती हाताबाहेर जाणार नाही यासाठी आपापल्या परीने कामाला सुरुवात करावी लागली. आमदार शेलार यांच्या मतदारसंघातील घटना असली तरी वांद्रे पूर्वेतील नर्गिस दत्त नगर, भारत नगर या झोपडपट्टीतील लोकही या वेळी जमा झाले होते. त्यामुळे सिद्दिकी पिता-पुत्रांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बाबा सिद्दिकी यांनी तर लोकांना हात जोडून विनवण्या केल्या. तुमची सगळी व्यवस्था करतो पण गर्दी करू नका, आपापल्या जागी परत जा, अशी विनवणी बाबा सिद्दिकी करीत होते. स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना टीकेचे धनी व्हावे लागत होते. या दडपणामुळे सिद्दिकी पिता-पुत्रांनी सर्व सूत्रे हाती घेत मजुरांच्या अडचणी सोडविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.तर, वांद्रे येथील जमावाची माहिती घेण्यासाठी स्वत: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शेलारांना फोन केले. शहा यांनी वस्तुस्थिती सांगतानाच मजुरांच्या समस्याही या वेळी मांडल्या. घडल्या प्रकरणी शेलारांवर बुधवारी राष्ट्रवादीकडूनही निशाणा साधण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, शहा यांनी केलेली विचारणा शिवाय जवळच असलेले मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवासस्थान यामुळे राजकारणापेक्षा गैरसमज, अफवांमुळेच हा प्रकार घडल्याचे समजते.काय आहेत मजुरांचे प्रश्नशेलार यांनी आज या मजूर संघटनांशी चर्चा करून त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला. लोकांच्या खाण्याच्या सवयी आणि येणारी पाकिटे यांचा कुठलाच मेळ नाही. त्यामुळे धान्य पुरविण्याची मागणी होत आहे. काही जणांनी रिचार्जची सोय नाही. मोबाइल बंद झाल्याने घरी संपर्क करता येत नसल्याची तक्रार केली.

टॅग्स :मुंबईकोरोना वायरस बातम्यावांद्रे पश्चिम