ठाणे : मे महिन्याच्या सुटीनंतर शाळेचे रस्ते पुन्हा आज गजबजलेले होते. शासनाने दिलेल्या आदेशानुसार नवीन अभ्यासक्रमाच्या नवीन इयत्तेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे स्वागत शाळेने दणक्यात केले. ठाण्यातील शाळांनी आणि व्यवस्थापकांनी गुलाबाचे फुल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केले. बालवाडीत प्रवेश करताना काही विद्यार्थ्यांनी हसत तर काहींनी रडत शाळेची पायरी चढल्याचे चित्र सर्वत्र दिसत होते. सुटीमध्ये उशिरा उठायची सवय असलेल्या चिमुकल्यांना झोप काही केल्या आवरत नव्हती. काही विद्यार्थी आपल्या मित्रमैत्रिणींना सुटीत काय मज्जा केली हे सांगण्यात दंग होते. शिक्षकांनीही नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची नावे विचारून नवीन कविता, गोष्टी सांगून मुलांची करमणूक केली. काही शाळांमध्ये रडणाऱ्या मुलांचे सांत्वन करण्यासाठी मिकी माऊस, डोरेमॉनसारख्या कार्टून्सचे ड्रेस घालून मनोरंजन करणारे काही जण सज्ज होते. सुटीनंतर शाळेत प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांनी मस्ती करण्याचेही सोडले नाही.
गजबजल्या साऱ्या शाळा
By admin | Updated: June 15, 2015 23:11 IST