Join us  

एअर स्ट्राईक पाकमध्ये नव्हे, काश्मिरातच झाले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 5:51 AM

पवारांचा आरोप : बालाकोटबाबत मोदींचा दावा खोटा

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बालाकोट येथील एअर स्ट्राईकवरून पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घेतल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप नेते करत आहेत. मात्र, बालाकोट येथील दहशतवादी तळांविरोधातील कारवाई पाकिस्तानात घुसून नव्हे, तर ही कारवाई काश्मिरातच झाली, असा दावा पवार यांनी रविवारी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या २० व्या वर्धापन दिनाच्या पूर्वदिनी पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून युवा वर्गाशी संवाद साधला. यावेळी बालाकोट आणि त्यावरून सुरू असलेल्या राजकारणाबाबत पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान घरात घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करू, अशी भाषा पंतप्रधान मोदींनी केली होती. प्रचारसभेत मोदींची ही भाषा तेव्हा लोकांनाही आवडत होती. प्रत्यक्षात मात्र पाकिस्तानात घुसून वगैरे कारवाई झालेली नाही. बहुतांश लोकांना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचीकल्पनाच नाही. त्यामुळे एअर स्ट्राईकनंतर पाकिस्तानला उत्तर दिल्याची भावना लोकांमध्ये निर्माण झाली. पुलवामाची प्रतिक्रीया म्हणून केलेली कारवाई पाकिस्तानात नव्हे तर काश्मिरातच करण्यात आली होती. काश्मीर भारताचा अविभाज्य अंग असल्यामुळे ही घटना भारतातच घडली म्हणावे लागेल, असे पवारांनी सांगितले.

देशात सांस्कृतिक सांप्रदायिकतादेशात पद्धतशीरपणे एका विशिष्ट धर्म समुदायाविरूद्धात विद्वेषाचे वातावरण तयार करण्यात येत आहे. सांस्कृतिक सांप्रदायिकतेची भावना वाढीस लागली आहे. भाजपला याचा राजकीय फायदा झाल्याचे निवडणुकीच्या निकालातून दिसून आले आहे.मात्र, सामाजिक ऐक्यासाठी, सौर्हादासाठी हे वातावरण घातक आहे. दोन समाजातील लोक एकमेकांविरूद्ध उभे असल्याचे चित्र सध्या देशात पाहायला मिळत असून हा प्रकार धोकादायक असल्याचे पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून युवा वर्गाशी संवाद साधताना स्पष्ट केले.महाराष्ट्रात भाजपकडे चेहराच नाही - पवारच्लोकसभा निवडणुकीत मोदींनी प्रखर राष्ट्रवाद जनतेसमोर मांडला आणि लोक भुलथापांना बळी पडल्याने देशात असा निकाल लागला. मात्र, विधानसभा निवडणूक वेगळी असते. महाराष्ट्रात भाजपकडे चेहरा नाही.च्राष्ट्रवादी काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे. त्यासाठी लोकांपर्यंत पोहोचायला हवे, असे आवाहन शरद पवार यांनी पक्ष कार्यकर्त्यांना केले.

टॅग्स :शरद पवारमुंबईएअर सर्जिकल स्ट्राईक