वसई : जिल्ह्यातील अनधिकृत बांधकामासंदर्भात सुरू असलेली कारवाई रोखण्यात यावी, अशी मागणी सेनेचे गटनेते वसंत वैती यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. सरकारी जागेतील तसेच गावठाणातील जमिनीवरील शासनाने वेळोवेळी केलेल्या ठरावाकडे त्यांनी आपल्या पत्रात मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.हरितवसई संरक्षण समितीने मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केल्यानंतर न्यायालयाने जिल्ह्यातील सर्व अतिक्रमणे हटवण्याबाबत संबंधीत शासकीय विभागाला आदेश दिले, त्यानुसार गेल्या ३ वर्षात वसई-विरार उपप्रदेशात सुमारे ७ हजार अनधिकृत बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. यासंदर्भात सेनेचे मनपातील गटनेते वसंत वैती यांनी मुख्यमंत्र्यांकडे दाद मागितली आहे. या निवेदनात कोणत्याही परवानग्या न घेता हरितपट्ट्यात ज्यांनी बंगले व व्यवसायिक गाळे बांधले आहेत अशांची तपासणी करून ही बांधकामे हटवणे आवश्यक असताना दुर्लक्ष करून शहरी भागातील गावठण, आदिवासींच्या जागा, शेतमजुरांची गावठणे यावरील बांधकामे तोडण्यात येत आहेत, असा त्यांनी आरोप केला आहे. यासंदर्भात शासनाने सर्व भागाला एकच न्याय द्यावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. (प्रतिनिधी)
अनधिकृत बांधकामांविरोधात मुख्यमंत्र्यांना साकडे
By admin | Updated: June 13, 2014 00:00 IST